नगरमध्ये उपलब्ध पाण्यातून ५० हजार हेक्‍टरवर चारा उत्पादन शक्‍य

खरीप, रब्बीतून आवश्‍यक तेवढी चारा निर्मिती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांचा विचार करुन शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. एकमेकांना साह्य करण्यासाठी शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे. - पंडित लोणारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, चाराटंचाईवर मात करण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकारातून चारा उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. धरणातील उपलब्ध पाण्यानुसार मुळा, भंडारदरा, निळवंडे, घोड, नांदूर मधमेश्वरमधून सुमारे एक लाख नव्वद हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळेल. त्यातील ५० हजार हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन होऊ शकते, असे प्रशासनाने गृहीत धरले आहे.  

जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक तालुक्‍यांत डिसेंबरपर्यंतच पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी चारा उत्पादन करण्याबाबत नियोजन आखले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार निळवंडे व भंडारदरा धरणात मिळून १९ टीएमसीपैकी सध्या १५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातील ४ टीएमसी जायकवाडीला दिले. १ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. दिड टीएमसी पाणी पिण्यासाठी व अर्धा टीएमसी मृत साठा आहे. आठ टीएमसी पाणी वापरात येईल. यातून दोन आवर्तने सुटणार आहेत. त्यातून संगमनेर, श्रीरामपुर, नेवासा तालुक्‍यातील साधारण साठ हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळेल.

मुळा धरणातील १८ टीएमसी पाण्यापैकी दोन टीएमसी पाणी जायकवाडीला दिले. पाच टीएमसी मृतसाठा असून एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. नगर शहरासह अन्य गावांना पिण्यासाठी साडेतीन टीएमसी पाणी गेले तरी साडेसहा टीएमसी पाण्यातून एका आवर्तनातून राहुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुक्‍यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळेल.

घोड धरणातून दोन आवर्तने मिळणार असून त्यात श्रीगोंदा, कर्जत तालुक्‍यातील दहा हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळेल. याशिवाय नांदुर मध्यमेश्वरमधून राहाता, कोपरगावला पाणी मिळणार आहे. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती असली, तरी धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा साधारण एक लाख नव्वद हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ होऊन त्यातून साधारण २५ टक्के म्हणजे ५० हजार हेक्‍टर क्षेत्रार चारा उत्पादन घेतले तरी एक लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होऊ शकतो असा प्रशासनाचा अंदाज आहे. उत्पादित झालेला चारा एक ते सव्वा महिना पुरू शकतो.

चारा उत्पादनासाठी कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकारातून १० गुंठे क्षेत्रासाठी चारशे साठ रुपये दिले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मका बियाणे दिले जाणार आहेत. जिल्हानियोजन समितीच्या निधीतून मुरघास बॅगा दिल्या जातील. आतापर्यत पशुसंवर्धन विभागाकडे पाच हजारांवर शेतकऱ्यांनी यासाठी नाव नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.

पेरणी पाहून देणार मुरघास बॅगा चारा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मुरघास बॅगा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती त्यासाठी निधी देणार आहे. मात्र बियाणे घेऊन पेरणी न करता लाभ उठवल्याचा या आधीचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे या वेळी संबंधित शेतकऱ्यांनी पेरणी केली की नाही, याची तपासणी कृषी विभागाकडून होणार असून त्यानंतरच मुरघास बॅगा दिल्या जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com