पूरग्रस्तांसाठी हेलिकॉप्टरमधून अन्न पाकिटांचा पुरवठा

पूरग्रस्तांसाठी हेलिकॉप्टरमधून अन्न पाकिटांचा पुरवठा
पूरग्रस्तांसाठी हेलिकॉप्टरमधून अन्न पाकिटांचा पुरवठा

पुणे: कोल्हापूर, सांगलीत महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना हेलिकॉप्टरमधून अन्न पाकिटे व पाणी पुरविण्यास भारतीय वायुसेनेने शुक्रवारपासून सुरवात केली. पुरामुळे आणखी ८५ हजार जण बेघर झाल्याने स्थलांतरितांची संख्या आता पावणेदोन लाखाच्या पुढे गेली आहे. बळींची संख्या २९ झाली असून ११ जण अद्याप बेपत्ता आहेत.      दरम्यान, अलमट्टी धरणातून आता चार लाख क्युसेक पाणी सोडण्यास सुरवात झाली. 

 मात्र, अचानक येरळा नदीला पूल आल्याने कृष्णेचा ‘इनफ्लो’ वाढल्याने प्रशासनासमोरील प्रश्‍न कायम आहेत. पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, सांगलीत दोन हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे टाकली गेली. कोल्हापूरशी अजूनही रस्ते संपर्क झालेला नसून वायू मार्गानेच मदत पाठविली जात आहे. कोल्हापुरात दोन फुटाने पूर पातळी कमी झाली आहे. सर्व गावांशी बोटीने किंवा कोणत्या तरी माध्यमातून संपर्क होतो आहे. मदतीसाठी लोकांकडून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत संपर्क केला जात आहे. काल राज्यपालांनी माझ्याशी बोलून माहिती घेतली. मात्र, एका-एका गावात अडीच-तीन हजार लोकं अडकलेली असतील व तेथे १०० बोटी गेल्या तरी लोकांचे समाधान करता येणार नाही. त्यामुळे तातडीची गरज असलेल्या व्यक्तींना वाचविणे तसेच पूरग्रस्त भागात पाणी, औषधोपचार आणि अन्न पुरवठा करण्यास आमचे प्राधान्य आहे.

अद्याप एअरलिफ्टिंग रेस्क्यू नाही सांगलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७६ बोटी आहेत. त्यात एनडीआरएफच्या ४२, तटरक्षक दलाची एक तर लष्कराच्या सहा बोटी आहेत. याशिवाय एनडीआरएफच्या सात व नौदलाच्या अजून बारा टीम सांगलीसाठी दिल्या गेल्या गेल्या आहेत. सांगलीत पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने धान्य पुरविले गेले. हवाई मार्गाने पूरग्रस्तांना बाहेर (एअरलिफ्टिंग रेस्क्यू) कोणाला काढण्याच्या सूचना नाही. आजारी, दुर्धर त्यांनाच एअरलिफ्ट करा, असे सांगितले गेले आहे. कोल्हापूरमध्येही ४८ पथके, ६३ बोटी, ४८१ जवान बचाव कार्य करीत आहेत, असे डॉ.म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. पुरामुळे सांगली जिल्ह्यात १३४११९, कोल्हापूर ११८३६५, सातारा ९५२१, पुणे ६११९ तर सोलापूर जिल्ह्यात २३४३७ नागरिक बेघर झालेले आहेत. त्यांच्यासाठी शासनाने ४८० मदत केंद्रे उघडली आहेत. ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील बोटीत एकूण किती जण होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, यात १६ लोक किनाऱ्यावर लागले व ९ मृतदेह आढळले. स्थानिक मतानुसार अजून ९ जण बेपत्ता आहे. त्यामुळे बोटीत एकूण ३४ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगलीत आता तीन इंचाने पाणी उतरले आहे. तर कोल्हापूरमध्ये दोन फूट पाणी उतरते आहे. अलमट्टीतून विसर्ग साडेचार लाख क्युसेकचा सुरू असला तरी इनफ्लो ३.९० लाख क्युसेक आहे. मात्र, येरळा नदीतून कृष्णेत पाणी येत असल्याने हा इनफ्लो वाढला आहे. मात्र, हा फुगवटा लवकर कमी होईल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. स्थलांतरित नागरिकांना १५ हजार रुपये शहरी भागात तर ग्रामीण भागासाठी १० हजाराची मदत थेट खात्यात जमा केली जाईल. त्यासाठी बॅंकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, खात्यात जमा करण्यास अडचणी असल्यास रोखीत मदत देण्याचे अधिकर जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.

पशुवैद्यकीय पथके रवाना पुरात फसलेल्या पशुधनाला सावरण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची मदत पथके तयार केली आहेत. नगरपालिका क्षेत्रात स्थलांतरित झालेल्या जनावरांना चारा पुरविणे, जनावरांवर औषधोपचार करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अशी कामे या पथकांना देण्यात आलेली आहेत. पूरग्रस्तांसाठी आम्ही मदतीचे आव्हान केले आहे. मात्र, आम्हाला फक्त चहा पावडर, बिस्किटे, ओआरएस, टुथब्रश, ब्लॅंकेटस्, सतरंजी, नवीन कपडे हवे आहेत. जुने कपडे आम्ही स्वीकारणार नाही. आर्थिक मदतीची इच्छा असल्यास दात्यांनी शासकीय कार्यालयात न देता थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावे. त्यांना कर सवलतदेखील मिळेल, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. पुरामुळे सांगलीत १० गाय, चार म्हैशी, तीन वासरे, सहा शेळ्या मेंढ्या व २७०० कोंबड्या मृत झाल्या आहेत. कोल्हापूरला १० गायी, १४ म्हैशी, २९ शेळ्या मेंढ्या व ५८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत. मात्र, पशुधन हानी पाणी उतरल्यानंतरच स्पष्ट होईल. ग्रामीण भागात खूप जनावरे असतात. ती वाहून गेली असावीत, असा अंदाज आयुक्तांनी वर्तविला.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. पाण्याच्या ३० हजार रवाना बाटल्या झाल्या असून ६० हजार बाटल्या सांगलीकडे जातील. याशिवाय कोल्हापूरला ४० टॅंकर व ३० टॅंकर सांगलीत पाठविले जातील. दरम्यान, पुणे, सोलापूर, सातारा भागातून सांगली, कोल्हापूरला काहीही प्रशासकीय मदत देण्याचे अधिकार तेथील स्थानिक प्रशासनाला दिले गेले आहेत. सांगलीमध्ये रिक्त असलेली निवासी उपजिल्हाधिकाऱ्याची जागा स्वतः डॉ. म्हैसेकर यांनी भरली आहे. सांगली पालिका आयुक्त म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याला तेथे समन्वयासाठी पुन्हा पाठविले गेले आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्यात तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारांनादेखील तेथे पाठविले जाईल.

१८ हजार वाहने अडकली पुणे-बंगलोर हायवे बंद असल्याने १८ हजार वाहने अडकून पडली आहेत. पाणी ओसरताच पुलांची तपासणी करून वाहतूक सुरू केली जाईल. वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी आधी जीवनाश्यक वस्तूंच्या ट्रक पुढे पाठविल्या जात आहेत. मदतीच्या गाड्या पोचल्याशिवाय इतर सामान्य वाहनांना मान्यता दिली जाणार नाही. तशा सूचना मी दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून आम्ही मदतीच्या वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांकरिता वेगळा कॉरिडॉर तयार करू, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले. दरम्यान, सांगलीत ४७ रस्ते, १६ प्रमुख राज्य मार्ग व ३१ जिल्हा मार्ग असे ४७ मार्ग बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ८८ रस्ते मार्ग बंद आहेत. कोल्हापूरमध्ये १८, शिरोळ ९, हातकणंगले ५ गावे पाण्याने वेढली आहेत. तर सोलापूरलाही एक गाव अजूनही पाण्याने वेढलेले आहे. दरम्यान, या जिल्ह्यांमधील लघू पाटबंधारे प्रकल्पांना धोका असल्यास मुख्य अभियंत्यांनी माहिती घेऊन प्रकल्प तातडीने रिकामे करावेत, असे आदेश दिले गेले आहेत.

राज्य शासनाने पाठविले ७६ कोटी पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी शासनाने ७६ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले आहेत. पुणे जिल्ह्यासाठी पाच कोटी, सोलापूर एक कोटी, सातारा २० कोटी तर सांगली व कोल्हापूरसाठी प्रत्येकी २५ कोटीचा निधी दिला गेला आहे. कोल्हापूरला डिझेल, पेट्रोल, रेशन हवे आहे. त्यासाठी रस्ता सुरू होताच ही मदत पाठविली जाईल. मात्र, गॅस सिलिंडरचा पुरवठा नौदलाच्या बोटने केला आहे. कोल्हापूरसाठी अन्न पुरवठा सातारा भागातून पुरवित आहे. आम्ही २४ तास कक्ष उघडला आहे. गोकूळ दुध संघाने मोफत दूध व पशुखाद्यदेखील वाटप सुरू आहे. स्थानिक दूध संघ तेथे मदत करीत आहेत. शासनाकडून या भागाला दूध पावडर पुरविण्याबाबत विचारणा झाली असता दूध पुरेसे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com