जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविणार : मंत्री जयकुमार रावल

मंत्री जयकुमार रावल
मंत्री जयकुमार रावल

मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्नपदार्थांतील भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी ‘ॲक्शन मोड’वर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. तसेच अन्नसुरक्षेविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविण्यात येईल, अशी माहितीही श्री. रावल यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र आढावा बैठक वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन भवन येथे श्री. रावल यांनी घेतली. या वेळी ते बोलत होते. बैठकीत अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह दोन्ही विभागांचे राज्यातील सहआयुक्त व सहायक आयुक्त उपस्थित होते. श्री. रावल म्हणाले, की अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या विभागावर आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या समन्वयाने ‘टाइम बाउंड’ पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जबाबदारीने काम केले पाहिजे. विशेषतः दूध, तेल, मिठाई आदी अन्न पदार्थांतील भेसळ ही गंभीर बाब आहे. दूधभेसळ आढळल्यास त्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. दुधाच्या बाबतीत जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे. ‘ॲक्शन प्लान’च्या माध्यमातून राज्यात आणि विशेषतः मुंबईत काही ठिकाणी होणारी दुधातील भेसळ रोखणेही गरजेचे आहे. तसेच अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा पंधरवडा राबविण्यात येईल.

अन्न विभागाने आपल्या सादरीकरणात विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल्स तपासणी, नियमित तपासण्या, व्हिजन डॉक्युमेंट, राज्यातील अन्न तपासणी प्रयोगशाळा, अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ अंतर्गत केलेली कार्यवाही, क्रॉस चेकिंग, जंक फूड तपासणी मोहीम, स्वस्थ भारत यात्रा, स्ट्रीट फूड हब, दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी व कार्यवाही, विभागातील रिक्त पदे याबाबत माहिती दिली. त्यावर श्री. रावल यांनी पुढील कार्यवाहीबाबत निर्देश दिले. तसेच प्रयोगशाळेची संख्या वाढवणे व रिक्त पदांबाबत बृहत् आराखडा तयार करण्यासाठीही आदेश दिले.

औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना रावल म्हणाले, की लोकांच्या आरोग्याला केंद्रबिंदू मानून विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. ई-सिगारेट, औषध द्रव्यांचा अमली पदार्थ म्हणून होणारा वापर रोखणे, लॅब व मनुष्यबळ वाढवण्यासाठी आराखडा तयार करणे, राज्यात औषध निर्माण युनिट वाढवणे, शाळा, कॉलेजमधून जागृती करणे आदी विषयांबाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com