परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटीज) अंतर्गत विमाभरपाईसाठी २ लाख ६८ हजार ४०४ पूर्वसूचना विमा कंपनीकडे विविध माध्यमांतून दाखल केल्या आहेत.
मंगळवार (ता. ५) पर्यंत २ लाख ८ हजार ३५२ शेतकऱ्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले आहे. नुकसान आढळून न आल्यामुळे ४ हजार ७४३ पूर्वसूचना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना टोल फ्री नंबरद्वारे विमा कंपनीचे कॉल सेंटर, ई-मेल, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर (एनसीआयपी) ऑनलाइन पद्धतीने, तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे ऑफलाइन अशा चार पद्धतीने दाखल केल्या आहेत.
जिल्ह्यात जुलै आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुरुवातीला वाढीच्या तर त्यानंतर परिपक्वतेच्या अवस्थेतील शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अजूनही पाऊस सुरूच असल्यामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत तसेच काढणीपश्चात नुकसानीबद्दल विमापरतावा मिळण्यासाठी पूर्वसूचना येत आहेत. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार टोल फ्री नंबरवरुन कॉल सेंटरकडे १८ हजार ६५४ पूर्वसूचना, ई-मेलद्वारे ५ हजार ४७४ पूर्वसूचना, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर १ लाख ६६ हजार ७८५ पूर्वसूचना, तर शेतकऱ्यांनी स्वतः (ऑफलाइन) विमा कंपनी प्रतिनिधींकडे ७७ हजार ४९१ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.
विमा परताव्याच्या प्रतीक्षेत शेतकरी पाऊस सुरूच असल्यामुळे नुकसान पूर्वसूचनांचा डोंगर वाढत आहे. परंतु विमा कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना अद्याप विमा परतावा अदा केलेला नाही. विमा भरपाई तत्काळ अदा करावी, अशी मागणी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.