सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतर

सांगलीजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील नागरिकांचे आणि जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगलीत चौदा हजार  जनावरांचे स्थलांतर Fourteen thousand in Sangli Migration of animals
सांगलीत चौदा हजार  जनावरांचे स्थलांतर Fourteen thousand in Sangli Migration of animals

सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील नागरिकांचे आणि जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार २१९, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ७४६, वाळवा क्षेत्रातील ३ हजार २६२, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ९०, शिराळा तालुक्यातील २ हजार २२८, पलूस तालुक्यातील ५ हजार २५५ जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ५ व पलूस तालुक्यातील ३ अशा एकूण ८ जनावरांची जीवितहानी झाली आहे.; वारणेत ३१.१९ टीएमसी पाणीसाठा जिल्ह्यातील वारणा धरणात शनिवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत ३१.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. धरणांतील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता (टीएमसी) पुढीलप्रमाणे : कोयना ८७.१५ (१०५.२५), धोम १०.७१ (१३.५०), कन्हेर ७.७० (१०.१०), दूधगंगा  १९.०५ (२५.४०), राधानगरी ७.८१ (८.३६), तुळशी २.९९ (३.४७), कासारी २.२८ (२.७७), पाटगाव ३.२१ (३.७२), धोम बलकवडी ३.५४ (४.०८), उरमोडी ७.०३ (९.९७), तारळी ५.१९ (५.८५), अलमट्टी  ८१.९० (१२३). 

नुकसानीच्या पूर्वसूचना ७२ तासांच्या आत द्या  पंतप्रधान पीकविमा योजना जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी मुंबई मार्फत राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या पिकांचे अतिवृष्टी, पूरसदृश्य परिस्थितीमुळे नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना ७२ तासांमध्ये देणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील नदीकाठावरील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यांना या पीकविम्याचा लाभ होईल, असेही मस्तोळी म्हणाले. मध्यरात्रीच घेतला सुरक्षित आश्रय नवेखेड, जि. सांगली : कृष्णा काठावरील लोकांनी महापुरातून सावरण्यासाठी एकमेकांना मदतीचा हात दिला. गुरुवारी (ता. २३) दुपारपासून कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढू लागली आणि लोकांना महापुराचे चित्र पुढे दिसू लागले. नदी काठावरील बोरगाव, रेठरे हरणाक्ष, गौडवाडी, सातपेवडी, बनेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, शिरगाव,  शिरठे, या गावात मध्यरात्री पाणी आणखी वाढू लागले. लोकांनी आता कुणाची मदत होईल, यावर विश्वास ठेवला नाही. धान्य लागणाऱ्या काही वस्तू बरोबर घेतल्या अन्  तातडीने घराला कुलूप घातले. आशेने धडपडणाऱ्या जनावरांच्या दाव्याला हात घातला कुठे जायचे माहीत नव्हते, फक्त पाण्याने वाटा घेरण्या याआधी बाहेर पडणे गरजेचे होते. कोरोनाची भीती ही होती, परंतु पै-पाहुणे मित्र, मंडळी भावकी पुढे आली ज्यांची घरे गावापासून लांब, पाणी येणार नाही, अशा ठिकाणी होती. त्यांच्या घरांच्या, गोठ्याच्या दिशेने जनावरे आणि माणसं चालू लागली. नवेखेड येथील मराठी शाळेत अनेक कुटुंबांनी आसरा घेतला. अनेकांनी आपली उभी पिके कापून जनावरांना चारा दिला. आपल्या घासातला घास दिला. प्रशासकीय मदत मिळेल न मिळेल परंतु, आपल्या लोकांनी या काळात एकमेकांना केलेली मदत लाख मोलाची ठरली आहे. बस स्थानकात अडकून पडलेल्यांना जेवण पूरपरिस्थितीमुळे इस्लामपूर बस स्थानकात अडकलेल्या १२५हून अधिक प्रवाशांच्या जेवणाची बस स्थानकावरच सोय करण्यात आली. इस्लामपूर एसटी प्रशासन व ‘माणुसकीच नातं’ यांनी याचे नियोजन केले होते. पूरपरिस्थितीमुळे लांब पल्ल्याहून येणाऱ्या बसेस राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरनजीक किणी व शिरोली येथे पाणी आल्याने इस्लामपूर आगारात अडकल्या होत्या. सांगली रस्ताही अतिवृष्टीमुळे बंद झाला होता. सुमारे ५००हुन अधिक प्रवासी इस्लामपूर बस स्टँडवर अडकले होते. इस्लामपूर आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील व त्यांच्या टीमने जे मार्ग रिकामे आहेत, त्यांची माहिती घेऊन प्रवाशांना घरी पाठवले. तरीही १०० ते १२५ प्रवासी इस्लामपूर स्थानकात अडकले होते, त्यांना जाण्यास कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता, प्रवाशांमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश होता, रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची जेवणाची व राहण्याची व त्याच बरोबर सुरक्षितता ध्यानात घेऊन इस्लामपूर आगार व्यवस्थापनाने इस्लामपूरमधील माणुसकीच नात व साक्षी ग्रुप, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तातडीने सर्व प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली. सामाजिक संस्थेकडून एक हॉल उपलब्ध करून सर्व प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था केली. 

कोल्हापूरच्या पूरपट्ट्यातील शंभर गावांत अंधार कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व पूरस्थितीमुळे  १०९ गावांचा वीजपुरवठा पूर्णत: खंडीत तर ५६ गावांचा अंशत: बाधित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लक्ष १५ हजार २५४ वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर झाला आहे.  महावितरणची यंत्रणा सज्ज असून, शक्य तिथे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर  कार्यरत आहे. महावितरणने पूरपूर्व नियोजन केले असून, आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध ठेवली आहे. वीज ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे. पूरस्थितीमुळे कोल्हापूर शहर विभागातील ३ उपकेंद्रे ( नागाळा, दुधाळी व गांधीनगर)१९ वीजवाहिन्या, ५०३ वितरण रोहित्रे बंद असल्याने ५० हजार ३२३ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण १ विभागातील ६ उपकेंद्रे (वेतवडे, दिघवडे, बोलोली, थावडे, कांचनवाडी, सातवे व राशिवडे), २५ वीजवाहिन्या व ६७७ वितरण रोहित्रे बंद आहेत. त्यामुळे परिते,कळे, शाहूवाडी, फुलेवाडी, कदमवाडी, कोडोळी, पन्हाळा व गगनबावडा या उपविभागातील ६४ गावांचा वीजपुरवठा पुर्णत: बाधित तर ३७ गावांचा अंशत: बाधित  झाला असून, ५१ हजार १८१ वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण २ विभागातील ६ वीजवाहिन्या व २४८ वितरण रोहित्रे बंद असल्याने हुपरी, मुरगुड, कागल व राधानागरी या उपविभागातील ४५ गावांचा वीजपुरवठा पुर्णत: बाधित तर १५ गावांचा अंशत: बाधित  झाला असून, १२ हजार ९०३ वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गडहिंग्लज विभागात १ (१९ ग्राहक) तर जयसिंगपूर विभागात २ (२८ ग्राहक) गावांचा वीजपुरवठा  अंशत: बाधित झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com