देशात ४० लाख कापूस गाठींच्या मागणीत घट

लॉकडाऊनमुळे देशभरातील वस्त्रोद्योगाची चाके थांबली आहेत. परिणामी देशात उत्पादित ४० ते ४२ लाख गाठींची मागणी कमी झाली आहे.
देशात ४० लाख कापूस गाठींच्या मागणीत घट
देशात ४० लाख कापूस गाठींच्या मागणीत घट

जळगाव ः लॉकडाऊनमुळे देशभरातील वस्त्रोद्योगाची चाके थांबली आहेत. परिणामी देशात उत्पादित ४० ते ४२ लाख गाठींची मागणी कमी झाली आहे. पुढे लॉकडाऊन दूर झाले तरी देशांतर्गत कापूस बाजारात मोठा दबाव वाढणार असून, खासगी बाजारातील कापूस दरांची स्थिती सुधारण्याची कुठलीही शक्‍यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  देशात सुमारे १२०० सूतगिरण्या तर सुमारे ९५० जिनींग प्रेसिंग कारखाने आहेत. लुधियाना, कानपूर, भिवंडी, इचलकरंजी, गुंटूर आदी भागात उद्योजकांनी टेक्‍सटाईल पार्क उभारले आहेत. सूतगिरण्यांना देशात दर महिन्याला २२ ते २५ लाख गाठींची गरज असते. परंतु लॉकडाऊनमुळे हा उद्योग मागील ४० ते ४२ दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. सहा गाठींपासून (एक गाठ १७० किलो रुई) एक मेट्रिक टन कापडाचे उत्पादन घेतले जाते. कापूस जगत किंवा वस्त्रोद्योगाचे वर्ष १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबर असे असते.  अर्थातच देशात ऑक्‍टोबर ते मार्चच्या मध्यापर्यंत सुमारे १३० लाख गाठींवर प्रक्रिया झाली. त्यापासून कापडाची निर्मिती झाली. तामिळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातमधील कापडाची मोठ्या प्रमाणात युरोपात निर्यात केली जाते. तसेच सुताची निर्यात चीन, बांदलादेश, व्हीएतनाम येथे केली जाते. देशात पाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. कापड मिला किंवा यंत्रमाग, हातमाग उद्योग ठप्प असल्याने सुताला उठाव नाही.  सुताचे उत्पादन झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात त्याचा कापड निर्मितीसाठी उपयोग करणे आवश्‍यक असते. अन्यथा त्याचा दर्जा घसरतो. निर्यातीसंबंधीच्या मापदंडात हे सूत येत नाही. मग ते पडून राहते. परिणामी सूतगिरण्या ठप्प आहेत. राज्यात सुमारे ७५ सूतगिरण्या आहेत. तर मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी येथे यंत्रमाग, हातमाग उद्योग आहे. हा उद्योग ठप्प आहे. ज्या मिला, गिरण्यांनी परदेशात कापड, सुताची मध्यंतरी विक्री केली. त्यांचे चुकारे त्यांना प्राप्त झालेले नाही. हा उद्योग अडचणीत आलेला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, दिल्लीत मोठा कापड उद्योग देशातील वस्त्रोद्योगाचा आलेख

  • एकूण सूतगिरण्या : १२०० 
  • एकट्या तामिळनाडूतील सूतगिरण्या : ५००
  • एका सूतगिरणीची दररोजची गरज : ५५ ते ७० गाठी
  • चीन, युरोपात कापड, सुताला मागणी असते. तेथून रिकामे कंटेनर (मालवाहू जहाज) येत नसल्याने निर्यातच होत नसल्याची स्थिती आहे. सूतगिरण्या, कापड मिल्स ठप्प असून, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करणेही शक्‍य नाही.  — दीपक पाटील, अध्यक्ष,  लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ, जि.नंदुरबार.

    मार्चनंतर कापड, सुताची निर्यात थांबली आहे. हा उद्योग किमान ४० दिवसांपासून बंद आहे. ४० ते ४२ लाख गाठींची मागणी घटली आहे. किंवा त्यांची उचलच झालेली नाही. देशातील वस्त्रोद्योग पुढे सुरू झाला तरी कापूस बाजारात फारशी सुधारणा होईल, असे मला वाटत नाही. आता फक्त सरकीलाच मागणी आहे.  - महेश पाटोदिया, जिनींग, स्पीनींग मिलचालक, मालेगाव, जि. नाशिक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com