शेतकरी अपघात विमा योजनेत तोतया एजंटकडून फसवणूक

तोतयेगिरी करून पैसे लुबाडण्याचा प्रकार आहे. मात्र पोलिस यंत्रणेला सबळ पुरावे पुरवूनही चौकशी झाली नाही व गुन्हा नोंदविला गेला नाही. - डॉ. अभिजित आहेर, प्रकल्प प्रमुख (ग्रामीण), जयका इन्शुरन्स ब्रोकरेज
शेतकरी अपघात विमा योजनेत तोतया एजंटकडून फसवणूक
शेतकरी अपघात विमा योजनेत तोतया एजंटकडून फसवणूक

नाशिक: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ तत्काळ मिळवून देतो, या बदल्यात ४० हजार रुपये द्या, लवकर काम होईल अशी खोटी बतावणी करून पैसे मागणाऱ्या तोतया एजंटचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सर्व पुराव्यांसहित जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीने याबाबत माहिती सादर करूनही या प्रकरणाची चौकशी व गुन्हा नोंदविण्याबाबत टाळाटाळ होत आहे.   गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसंदर्भात राज्य सरकार या अपघात विम्याचा हप्ता भरते. अपघात झाल्यानंतर मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास निकषानुसार शेतकऱ्याच्या वारसदाराला विम्याची रक्कम दिली जाते. महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून विमा सल्लागार म्हणून जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनी गेल्या तीन वर्षांपासून हे काम पाहते. यांचे व्यतिरिक्त कोणीही असे एजंट नेमलेले नाहीत. मात्र दावा लवकर काढून देतो असे सांगत तोतया एजंटने दाव्याच्या २५ टक्के रकमेची मागणी करून स्वतःच्या नावे धनादेश घेतले आहेत.  हे प्रकरण लक्षात आल्यानंतर जयका इन्शुरन्स ब्रोकरेजचे रूरल हेड अभिजित आहेर यांनी सिन्नर तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांना माहिती दिली. मयत बाळू सखाराम शिंदे यांची पत्नी वनीता शिंदे (रा. सोनारी) व मयत तुषार रावसाहेब जाधव यांच्या पत्नी राणी जाधव (रा. शहा पंचाळे) यांची फसवणूक झाली असल्याने पंचासमोर त्यांचे जबाब घेतले. एजंट बनावट असल्याचे समजल्यानंतर त्यांनी दिलेले धनादेश बँकेकडून बाऊन्स झाले. त्यानंतर सर्व प्रकरण व संबंधित फसवणुकीचे पुरावे सिन्नर पोलिस ठाण्यात सादर केले. पोलिस निरीक्षक श्री. रहाटे यांनी मयताच्या वारसदार वनीता शिंदे यांना बोलावून जबाब नोंदवून गुन्हा नोंदविण्यात येईल असे सांगितले. मात्र २७ जून रोजी तक्रार दाखल करूनही व याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.  महाराष्ट्रात अशा प्रकारे मयत शेतकऱ्यांचे वारसदारांना मिळत असलेल्या लाभातून २० ते २५ टक्के रक्कम फसवणूक करून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. मयत झालेल्या शेतकऱ्यांची व गोपीनाथ मुंडे योजनेत नावे समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांची नेमकी माहिती कुठून मिळते? पोलिस यंत्रणा गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ का करते? यामागील नेमके धागेदोरे काय हे तापसाअंती समोर येणार आहे.  आमदारांनी उपस्थित केला होता मुद्दा  सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पावसाळी अधिवेशनात फसवणुकीबाबत मुद्दा मांडला होता. मात्र पोलिस यंत्रणेकडून याबाबत पुढे कार्यवाही झाली नसून धनादेश वटला नसल्याने फसवणूक झाली नाही, असे पोलिस सांगतात व टाळाटाळ करतात असा आरोप जयका कंपनीकडून करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com