कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्याने जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या महापुराच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. वाढत्या पाण्याने नदीकाठ भयभीत झाला आहे.
गुरुवारी (ता. ६) सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी वेगाने वाढत आहे. यामुळे ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी महापुराने शेतीसह मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. हजारो नागरिकांना काही काळ बेघर होण्याची वेळ आली. प्रशासनाने मार्चमध्ये महापुराचा धोका व्यक्त करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात नद्यांच्या पाण्यांनी धोका पातळी गाठल्याने आता शिवारांमध्ये पाणी शिरण्यास प्रारंभ झाला आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्याने पुन्हा गावे वेढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या दोन तीन दिवसांच्या पावसाचा अंदाज घेतल्यास सलग पाऊस होत नाही ही जमेची बाजू असली तरी दोन दिवसांच्या पावसातच बहुतांशी धरणांतून पाणी सोडावे लागल्याने पुन्हा जर दोन तीन दिवस सलग पाऊस झाल्यास पूर वेगात येण्याच्या शक्यतेने जिल्हा धास्तावला आहे. ग्रामीण भागात जिथे जिथे तातडीने पाणी येण्याची शक्यता आहे. तिथून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना विनंती केली जात आहे.
गेल्या वर्षीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडूनही आढेवेढे न घेता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होत आहे. एनडीआरएफच्या पथकांकडून नदीकाठचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. अद्यापही पर्यायी रस्ते सुरू असल्याने या रस्त्यावरून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.