सांगली जिल्ह्यातील एफआरपीचा तिढा कायम

शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली.
Sugarcane
Sugarcane

सांगली ः शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत बैठक घेण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. परंतू कोल्हापूरच्या पद्धतीनेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने घोषणा करणार का? की गतवर्षीप्रमाणे एफआरपीचे तुकडे करणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीचे तीन टप्पे करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणे मुश्कील आहे.जिल्ह्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्यात गाळप हंगाम सुरू होईल. हंगाम सुरू झाला असल्याने ऊसदराबाबत चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक पाहता सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे एकत्र येवून दरवर्षी ऊस दराचा तोडगा काढतात. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून दोन्ही जिल्हे दराबाबत वेगवेगळ्या बैठका घेवून दर ठरवतात. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अगोदर ऊस दराची कोंडी फोडतात. त्यानंतर सांगली जिल्हा ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतात. कोल्हापूर जिल्ह्यात जो काही निर्णय होतो, तोच निर्णय सांगलीतील साखर कारखाने घेतात. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. त्याबैठकीत एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस दराबाबत बैठक घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या दोन वर्षांचा विचार करता, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने जे ऊसदराबाबत निर्णय घेतात, तोच निर्णय सांगलीतील साखर कारखाने घेतात. परंतु गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडले होते. शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार की एफआरपीचे तुकडे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘एकरकमी एफआरपीसाठी शासनाने मदत करावी’  यंदाच्या हंगामात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका साखरेच्या उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे. एक टन उसाचे गाळप केल्यानंतर एक क्विंटल साखर तयार होते. परंतू या पावसाच्या फटक्याने एका टनाला ८०० ते ९५० किलो साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. साखर निर्यात केलेले अनुदान अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी आणि बॅंकानी कर्ज पुरवठा करावा. तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे, असे कारखानदारांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया एफआरपीत वाढ केली आहे. ही बाब चांगली आहे. मात्र शासनाने त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. मुळात बॅंकेकडून उचल मिळताना ती साखरेच्या पोत्यावर मिळते. परंतु सध्या कोणत्या आधारावर बॅंक उचल देणार हा प्रश्न आहेच. त्यामुळे एकरकमी एफआरपी कशी देता येईल. एकरकमी एफआरपी देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी. आम्ही एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहोत. परंतु शासनाने आमची देणी दिली तरच ते शक्य आहे. आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी मान्य आहे. - अरुण लाड, चेअरमन, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल, ता. पलूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com