Mumbai apmc
Mumbai apmc

मुंबई बाजार समितीत फळे, कांदा-बटाटा बाजार सुरु 

गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही.

मुंबई: गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही. दिवसभरात बाजार समितीच्या सर्व आवारात मिळून सुमारे सातशे वाहने शेतीमालाची आवक झाली आहे. तर भाजीपाला बाजारातून आणि विविध चेकनाक्यावरुन सुमारे सहाशे वाहने भाजीपाला मुंबई शहरासाठी रवाना झाला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ११ ते १७ हे हा आठवडाभर बंद करण्यात आली होती. सोमवारी (ता.१८) पासून समितीचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय होऊन भाजी, धान्य आणि मसाला बाजार सुरु करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात काल गुरुवारपासून (ता.२१) पासून फळे आणि कांदा बटाटा बाजार चालू झाले आहेत. या बाजार आवारांची वाहन प्रवेश मर्यादा कांदा बटाटा बाजार - १०० वाहने तर फळ बाजार आवार - २०० वाहने इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी फळे बाजारात २५५ वाहने आणि कांदा बटाटा बाजारात ७३ वाहने आली आहेत. 

मात्र, इतक्या दिवसांनी फळं बाजार सुरु करताना व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. मे महिना म्हणजे हापूस आंब्याचा हंगाम. या हंगामात बाजारात अगदी पाय ठेवायलाही जागा उरत नाही, इतक्या प्रमाणात बाजारात आंबे विक्रीसाठी येतात. हापूस आंब्यापाठोपाठ कलिंगड, खरबूज, पपई ही फळेही येत असतात. या वर्षी तर मे महिन्यातच रमजान महिना आल्याने फळांना मोठी मागणी असणार म्हणून तीन महिने आधीपासून शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, पपई यांची लागवड केली होती. तीन महिन्यांत ही पिके निघतील आणि चांगला पैसा हातात येईल, अशी आशा होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच निराशा झाली. 

मार्च, एप्रिल तर गेलाच आणि आता हक्काचा मे महिनाही संपत आला आहे. त्यात दहा दिवस फळ बाजार बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातला माल शेतातच पडून राहिला. जो माल खरेदी करुन नेला, त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी पुन्हा माल उचलण्यास नकार दिला. सुरुवातीला बाजार बंद असला तरी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे लोकही आता शेतकऱ्यांकडे यायचे बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना आपला माल विकण्याची गळ घालायला सुरुवात केली आहे. व्यापारी मात्र व्यापार करायचा की नाही, या विचारात आहेत.  कोरोना संसर्गाची भीती आहेच, शिवाय माथाडी कामगारांची कमतरताही आहे. शेतकरी वारंवार माल विकण्याची गळ घालत असल्याने त्यांच्यासाठी व्यापारी बाजारात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com