साडेतीनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भवितव्य अधांतरी 

शेतकरी गट
शेतकरी गट

कोल्हापूर : भांडवलाचा अभाव, पुरेशा सुविधा नसल्याने राज्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भवितव्य अधांतरी बनले आहे. या कंपन्या जागतिक बॅंक व राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पा अंतर्गत स्थापन करण्यात आल्या. या प्रकल्पाची मुदत दोन महिन्यानंतर संपणार आहे. या मुदतीनंतर या कंपन्यांकडे कृषी विभागाचे लक्ष असणार का याबाबत संदिग्धता व्यक्त होत आहे.  विद्युतजोडण्या मिळण्यात अडथळे, खेळत्या भांडवलाची अनुपलब्धता यामुळे बहुतांशी कंपन्यांची अवस्था बिकट झाली आहे. अर्धवट राहिलेली बांधकामे, अडकलेले भांडवल यामुळे येत्या काही दिवसांत या कंपन्यांना ठोस मदतीचा निर्णय न झाल्यास या कंपन्यांच्या स्थापनेचा उद्देशच दुरावण्याची शक्‍यता आहे.  २०१४ ते १६ या कालावधीत शेतकरी गट स्थापन करुन त्याला शेतकरी कंपन्यांचे स्वरुप देण्यात आले. विविध पिके, भाजीपाला, फळांचे उत्पादन करणारे शेतकरी एकत्र करून या कंपन्या स्थापन करण्यात आल्या. बी-बियाणे, खते, औषधे, आर्थिक साह्य, पीक व शेतकरी विमा, उत्पादन, काढणीपश्‍चात  एकत्रित विक्री व्यवस्था, प्रक्रिया आणि बाजाराच्या मागणीनुसार शेतमालाचे उत्पादन करणारे हा कंपन्यांचा उद्देश होता. मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार टाळणे यासाठी या कंपन्या स्थापन करण्यात आल्या. उत्पादक ते ग्राहक अशा साखळ्या निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले.  

खेळत्या भांडवलाची अडचण कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर कंपन्यांनी संबधित उत्पादनांच्या प्रक्रियेसाठी इमारती बांधकाम सुरू केले. काहींनी पूर्ण केले, तर काहींचे अद्याप अपूर्ण आहे. ज्या कंपन्यांनी स्ट्रक्‍चर तयार केले. आता या कंपन्यांना भांडवलाची गरज भासत आहे. खेळते भाग भांडवल नसल्याने कंपन्यांची उलाढाल थांबली आहे. बी-बियाणे, प्रक्रियेसाठी निधीची गरज असते, या निधीअभाव या कंपन्यांचे काम रखडले आहे. 

सीसीच्या स्वरूपात मदत द्या कंपन्यांना एकाच वेळी भांडलाची गरज नसते. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घ्यायचा असतो. त्या त्या वेळी रक्कम गरजेची असते. पण या कंपन्यांना बॅंका दारातही उभे करून घेत नसल्याची स्थिती आहे. व्यापाऱ्यांना जशा बॅंका सीसीच्या स्वरूपात रक्कम उपलब्ध करुन देतात तशी सुविधा कंपन्यांना द्यावी, अशी मागणी या कंपन्यांची आहे. 

विद्युतजोडण्या रखडल्या... अनेक ठिकाणी बांधकामे पूर्ण झाली आहेत. परंतु विद्युत जोडण्याही रखडल्या आहेत. अनेक कारणे सांगत विद्युत जोडण्या देण्यास महावितरणकडून नकार घंटा वाजविण्यात येत आहे. याचबरोबरच संबधित इमारत लांब असल्यास खांबाचा खर्च व अन्य खर्चही मोठा असल्याने विद्युत जोडणी करणे हे या कंपन्यांपुढे आव्हान ठरले आहे. अनेक प्रक्रिया युनिटना विद्युतपुरवठा गरजेचा असतो. पण या त्रांगड्यात हे कामही रखडले आहे. 

प्रशिक्षणाचा अभाव या कंपन्यांच्या अडचणींकडे जबाबदार घटकांचे फारसे लक्ष नसल्याची स्थिती आहे. यामुळे हे गट एकत्रीत काम करण्यात अडचणी येत आहेत. उत्पादक कंपनी म्हणून एकत्रित येण्याची मानसिकता तयार करण्याचे काम आत्मासह कृषी विभागावर होते. परंतु कंपन्याच अडचणीत येत असल्याने कोणीच काही करू शकत नसल्याची स्थिती आहे. कामकाज ठप्प असल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भांडवल कंपनीत अडकून पडल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार उत्पादक कंपन्यांची आहे. यातच हा प्रकल्प दोन वर्षांत बंद होणार असल्याने नंतर काय, याची चिंता कंपन्यांना लागून राहिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com