मुंबई : ‘‘आपले सरकार ट्रिपल सिट सरकार आहे, मी मुद्दामहून हे बोलत आहे. टीका ऐकायची खूप सवय झाली आहे, आता कौतुक झाले की, भीती वाटते. चित्रपटातील डायलॉगप्रमाणे थप्पडसे डर नही लगता साहब, प्यार से लगता है. अशा या थपडा घेतल्या आणि दिल्या आहेत. जितक्या घेतल्या तितक्या दाम दुपटीने दिल्या सुद्धा आहेत. पुढे सुद्धा देऊ, त्यामुळे आम्हाला कोणी थप्पड देण्याचे बोलू नये. अशी एक थप्पड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसैनिकाच्या रक्तातील गुण आहे,’’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. ठाकरे म्हणाले, ‘‘एका चांगल्या कामाची सुरुवात मी मुख्यमंत्री पदावर असताना होईल, असे मला स्वप्नातही कधी वाटले नाही. चाळींचा खूप मोठा इतिहास आहे. अनेक मोठी लोकं, या चाळीने दिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगणारे लोकमान्य फक्त ठासून सांगून गप्प बसले नाहीत. त्यांनी चळवळ उभी केली. अनेक लोक यातून पुढे आले.’’ कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका : शरद पवार हा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक एकतेचा ठसा व्यक्त करणारा आहे. या ठिकाणी कोकणातील लोक राहतात, या ठिकाणी घाटावरचे लोक राहतात, घाट आणि घाटा खालच्या दोन्ही लोकांना एकसंध करण्याचे काम या परिसरात केले जाते, याचा मला आनंद आहे. या चाळींमध्ये काही बदल केले पाहिजेत, अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. या चाळी आज ना उद्या जाणार, या ठिकाणी मोठाल्या इमारती उभ्या राहणार. माझी एकच विनंती आहे, या २०-३० मजली इमारती उभ्या राहतील. पण यामधला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका, असे शरद पवार म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.