नगर : जिल्ह्यामध्ये यंदा सातत्याने बदलत्या हवामानाचा रब्बीतील हरभरा पिकावर परिणाम होताना दिसत आहे. सकाळी पडणारे धुके, ढगाळ हवामानामुळे कर्जत, पारनेर भागात हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नगर जिल्ह्यामध्ये रब्बीत हरभऱ्याचे १ लाख १८ हजार १०३ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र, साठ टक्के क्षेत्रावरच म्हणजे ७० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यंदा, पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची आशा होती. मात्र, फारसे क्षेत्र वाढले नाही.
सध्या हरभऱ्याला घाटे लागलेले आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून सातत्याने हवामान बदलत आहे. सकाळी धुके, ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पारनेर, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड भागात हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेतले जाते. उत्पादनात घट होण्याची भीती आहे, असे राजेंद्र गलांडे या शेतकऱ्यांनी सांगितले.
हरभऱ्याचे पीक अडचणीत असल्याने व उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात असताना घाटेअळीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा? याबाबत कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन मिळत नाही. कृषी विभागाने तातडीने घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.