नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. १५ हजार तक्रार अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे दाखल केले. परंतु यावर प्रशासनाने कुठलीच कार्यवाही केली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे- कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात सप्टेंबर- आक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्यातूनही तसे निष्पन्न झाले. परंतु ७२ तासाच्या आत पीकविमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेल्या मोजक्या शेतकऱ्यांना पीकविमा देऊन कंपनीने ९० टक्के शेतकऱ्यांची फसवणूक केली. उंबरठा उत्पन्न, पीक कापणी प्रयोग व इतर जाचक अटी रद्द करून सरसकट व तत्काळ पीकविमा मंजूर करावा. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी गंगाधर आऊलवार, दीपक रेड्डी मरतोळीकर, विद्यासागर जुक्कलवार, वैभव पाटील मरतोळीकर, यादवराव बोरगावकर, जावेद अहमद, संग्राम पाटील, मारोती पाशमवार, गुरुलिंग सुलफुले, बालाजी दासरवाड, गंगाधर रेड्डी कलमुके व शेतकरी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.