पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा फौजदारी : शैलेश नवाल

जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर इन्शूरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.) पीकविम्या संदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
crop insurance
crop insurance

अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर इन्शूरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.) पीकविम्या संदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कंपनीने त्रुट्यांचे तत्काळ निराकरण करून येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी (ता. २८) दिले. तसे न झाल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी बैठकीत दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत कृषी विभागाचा आढावा श्री.नवाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, लिड बँक मनेजर एल. के. झा यांच्यासह विभागीय कृषी अधिकारी व विमा कंपन्यांचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, अतिवृष्टीमुळे तसेच किडीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत ३३ टक्क्यांवर पिकांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा. या अनुषंगाने पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून तत्काळ विम्याचे पैसे मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. सोयाबीन मोजणी केंद्रावर गुणवत्तापूर्ण सोयाबीन छाटणी करून उर्वरित सोयाबिनचे ग्रेडिंग करण्यात यावेत. पीक विम्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून तालुकास्तरीय बैठकी घेऊन परिस्थिती संदर्भात अवगत करावे. आंबिया बहार संत्रा गळती किंवा नुकसान संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यःस्थिती जाणून घेतली.  या अनुषंगाने हवामान आधारित फळपीक विमा ज्या शेतकऱ्यांनी केला आहे, अशांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाने संबंधित विमा कंपनीशी समन्वय ठेवून भरपाई मिळवून द्यावी.

‘कंपनीने त्रुटींचे निराकरण करावे’ एआयसी कंपनीकडे पीकविमा काढलेल्या सुमारे ६०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारीपासून विम्याचे पैसे अद्यापपर्यंत जमा झाले नाहीत. ही बाब अतिशय गंभीर आहे. संबंधित कंपनीने विम्याच्या अनुषंगाने त्रुटींचा निराकरण तसेच बँक खाते अधिकृत करणे आदी बाबी तत्काळ पूर्ण करून येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत संत्रा फळपिकाचे विम्याचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. अन्यथा आपणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com