संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः चंद्रकांत पाटील

संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः चंद्रकांत पाटील
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः चंद्रकांत पाटील

नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात समावेश करून नुकसानीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.  राज्य सरकारच्या वतीने २०१८ या वर्षातील खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त भागासाठी मदत जाहीर करण्यात आली. परंतु या मदतीतून काटोल, नरखेड तालुक्‍यांतील संत्रा व मोसंबी पिकांना वगळण्यात आले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. ही बाब लक्षात घेता संत्रा व मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात समावेश करावा व मदत जाहीर करावी, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत काटोल पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, विधानसभाप्रमुख चरणसिंग ठाकूर, नरखेड पंचायत समिती सभापती राजू हरणे यांनी केली होती. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी या विषयावर भेटही घेतली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत येत्या दोन दिवसांत संत्रा, मोसंबी पिकांच्या नुकसान सर्वेक्षणाचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले.  काटोल तालुक्‍यात संत्रा-मोसंबीचे पीक ९,१२० हेक्‍टरवर आहे. संत्र्याच्या आंबिया बहाराची फूट अंशतः सुरू झाली आहे. मृगाचा बहार पावसाच्या अनियमिततेमुळे फुटलेला नाही. पाण्याच्या उपलब्धतेअभावी बागा वाळण्याची शक्‍यता आहे. सध्या ५,०१७ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नरखेड तालुक्‍यात बहुवार्षिक पिकाचे क्षेत्र १२,६७३ हेक्‍टर असून, अपुऱ्या पाण्यामुळे आंबिया बहार फुटण्यावर विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्णतेमुळे नियमित ओलिताची गरज भासते. पाण्याची पातळीदेखील खालावत असल्याने संत्रा, मोसंबी उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. नरखेड तालुक्‍यात ८,५८९ हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  कळमेश्‍वर तालुक्‍यात बहुवार्षिक संत्रा-मोसंबी पिकाचे क्षेत्र ३,६०८ हेक्‍टर असून, या तालुक्‍यात ५१.९३ टक्‍केच पाऊस झाला आहे. परिणामी विहिरीमधील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मोसंबीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्‍के क्षेत्राला फटका बसला आहे. मृग बहाराची फळे झाडावर असून आंबिया बहार फुटला आहे. पण दुष्काळामुळे बहार गळीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या तालुक्‍यात संपूर्ण क्षेत्रावरील संत्रा-मोसंबीचे नुकसान झाले आहे. तीन तालुक्‍यांत संत्रा-मोसंबी पिकाचे नुकसान झाले असताना त्यांना दुष्काळी सर्वेक्षणातून वंचित ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या विषयावर केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत मुंबईत कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांची ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट घेतली चर्चेनंतर मोसंबी आणि संत्रा उत्पादकांच्या बागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. दोन ते तीन दिवसांत ही कारवाई व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com