नाशिक : येवला तालुक्यातील अनेक भागात पालखेड डाव्या कालव्याचे शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकांना मोठी अडचण होते. सन २००४ नुसार शेतीला पाण्याचा कोटा मंजूर करावा. तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे शेतीसाठी हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली.
सिंचनाच्या पाण्याच्या मागणीसाठी येवला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे कडू यांची भेट घेतली. विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंतराव झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, ज्ञानेश्वर जगताप, सचिन पवार, जगदीश गायकवाड, सागर गायकवाड, गोरख निर्मळ, संजय खांदे,अंकुश कदम आदी उपस्थित होते.
तालुका सतत दुष्काळी आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यातून सुमारे ५२ टक्के साठा येवला तालुक्यासाठी आरक्षित आहे. तरीही एकूण लाभक्षेत्राच्या २० टक्केच पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत आहे.
राज्यभर बाष्पीभवन व वहनव्यय १५ टक्केच्या आसपास असताना केवळ याच कालव्याचा वहनव्यय ८० टक्क्यांपर्यंत दाखविला जातो. तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असे निवेदनात नमूद आहे. कडू यांनी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.
एरंडगाव येथील पडीत आसलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी अभावी वंचित राहिलेले सुमारे ३०० शेतकऱ्यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांचेकडे सादर केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले.
संघटनेच्या मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.