‘देशाच्या अर्थिक संपन्नतेसाठी जैव तंत्रज्ञान आवश्‍यक‘

शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी शेतकरी
शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी शेतकरी

अकोली जहाँगीर, जि. अकोला   ः  जैव तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी निर्माण होईल. तसेच जनुक संशोधित बियाणे पर्यावरणपूरकच आहेत, असा सूर शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.

जैव तंत्रज्ञानाच्या मान्यतेबाबत सरकारच्या अनास्थेला कंटाळून अकोली जहाँगीर येथील शेतकरी ललित बहाळे यांनी एचटीबीटी कापूस व वांग्याच्या बियाण्याची पेरणी केली. अलीकडेच हरियाना येथे दोन शेतकऱ्यांना जीएम वांग्यांची लागवड केल्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्या शेतातील पीक प्रशासनाने नष्ट केले होते. अकोली जहाँगीर येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची संपत्ती नष्ट केल्याबद्दल व नुकसान केल्याबद्दल त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी संकलनाचे आवाहन करण्यात आले. 

या वेळी ललित बहाळे म्हणाले, की शेतकरी मागील काही वर्षांपासून चोरून एचटीबीटी कापसाची लागवड करत आहेत. या सत्याग्रहामुळे आम्ही अभिमानाने या बियाण्यांची लागवड करू. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीक्षेत्रातील अवाजवी बंधने नाकारण्यासाठी बळ देण्याकरिता हा सत्याग्रह आहे. तंत्रज्ञान निवडीच्या शेतकऱ्यांच्या मागणीला या सत्याग्रहामुळे बळ मिळणार आहे.

शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख अजित नरदे म्हणाले, की जीएम तंत्रज्ञान फक्त शेतकऱ्यांसाठी गरजेचे नसून ते देशाच्या आर्थिक संपन्नतेसाठीही आवश्यक आहे. तेलबियांमधील जनुक तंत्रज्ञानामुळे आपण खाद्यतेलाची आयात कमी करू शकू. पिकांमधील वैविध्य वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे निर्माण होईल.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की जगभरात डझनभरापेक्षा अधिक पिकांत जनुक संशोधित तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले जाते. मका, कापूस, सोयाबीन, मोहरी अशा अनेक पिकांत जनुक संशोधित बियाण्यांचा वापर केला जातो. मानवासह जनावरेदेखील गेल्या दोन दशकांपासून या बियाण्यांपासून उत्पादित अन्नाचे, चाऱ्याचे सेवन करत आहेत; परंतु कोणाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. एकीकडे जनुक संशोधित बियाण्यांमुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याचा दावा केला जातो, उलटपक्षी जनुक संशोधित बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्यामुळे ते पर्यावरणपूरकच आहेत.  

या वेळी जिंतूर (जि. परभणी) येथील गजानन देशमुख, श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) शेतकरी अनिल चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील गोविंद रामदास शहाणे, तसेच हरियाना राज्यातील फतेहबाद जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी आपले अनुभव कथन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com