भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या वाऱ्यावर

भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या वाऱ्यावर
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या वाऱ्यावर

नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केल्या, मात्र शेतकऱ्यांना मोठा आधार असलेल्या शेळ्या-मेंढ्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने २एप्रिल २०१० साली काढलेल्या अध्यादेशानुसार जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र नव्याने यंदा काढलेल्या अध्यादेशात तो आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्याच्या दुष्काळी भागातील सुमारे ५२ लाख शेळ्या-मेंढ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्यासारखेच झाले आहे.  राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळ तीव्र आहे. शेतीत काहीच पिकलेले नाही. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे मात्र सध्या फक्त जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जनावरे जगवताना कसरत करावी लागत आहे. दुष्काळाची तीव्रता पाहून बऱ्याच भागात जनावरांच्या छावण्या सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी शेळ्या-मेढ्यांचे पालक मात्र चिंतेत आहेत

घरातील अतिमहत्त्वाच्या वेळी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शेळी फायदेशीर ठरत असल्याने ग्रामीण भागात नव्वद टक्के शेतकरी कुटुंबे शेळीपालन करतात. काही भागांत मेंढ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. शेतीला जोड असलेल्या शेळीपालनामुळे अनेक कुटुंबे सावरली असल्याने शासनानही शेळीपालनाचे प्रमाण वाढावे यासाठी महत्त्वाच्या योजना राबवत आहे. त्यासाठी शासनाचे शेळी-मेंढी महामंडळही कार्यरत आहे. अनेक ठिकाणी बेरोजगार युवकांनी बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केलेला आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळात मात्र शेळी पालनावर मोठे संकट आले आहे. शेळ्य- मेंढ्या जगवण्यासाठी शासन पातळीवर जनावरांप्रमाणेच काही तरी उपाययोजना होणे गरजेचे होते. मात्र कसल्याही उपाययोजना केल्याचे अजून तरी दिसत नाही. 

शासनाने छावण्या सुरू करण्यासंदर्भात सर्वप्रथम काढण्यात आलेल्या २ एप्रिल २०१० च्या अध्यादेशानुसार शेळ्या-मेंढ्याच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र प्रती शेळी, मेंढी पाच रुपये अनुदान दिले जाईल, असे उल्लेखित होते. त्यानंतर त्या अध्यादेशात बदल करून २५ जानेवारी २०१९  व १३ फेब्रुवारी २०१९ ला काढलेल्या अध्यादेशात सर्वच बाबीत बदल केला. त्यात शेळ्या-मेढ्यांच्या उपाययोजना बाबत काहीही उल्लेख नाही. त्यामुळे सद्यः स्थितीत तरी शेळ्या-मेंढ्या जगवण्याबाबत राज्यात कुठेही उपाययोजना नसल्याने शेळी, मेंढी पालक भर दुष्काळात शासनाने सध्या तरी वाऱ्यावर सोडल्याची स्थिती आहे. शेळी-मेंढी महामंडळानेही उपाययोजनांसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. राज्यात शेळ्यांची संख्या सुमारे तीस ते बत्तीस लाख तर मेंढ्यांची संख्या २२ लाखाच्या घरात आहे. नगरमध्ये शेळ्यांची संख्या ७ लाख ९२ हजार तर मेंढ्यांची संख्या ३ लाख ६१ हजार एवढी आहे.  तीन किलो चारा आवश्यक आवश्यकतेनुसार मोठ्या जनावरांना पंधरा किलो, तर लहान जनावराला साडेसात किलो चारा देण्याचा नियम आहे. शेळ्या-मेंढ्यांनाही चाऱ्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका शेळी-मेंढीला साधारण तीन किलो चारा देणे गरजेचे आहे. शासनाच्या जुन्या अध्यादेशानुसार शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र त्यासाठी प्रत्येक शेळी-मेंढीसाठी फक्त पाच रुपये अनुदान होते. त्यामुळे शासनाने अध्यादेशात छावण्या सुरू करण्याबाबत नियम केला असला तरी कमी अनुदानामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरूच झाल्या नाहीत. २०१५ च्या दुष्काळात आखतवाडे (ता. शेवगाव) येथे शेळ्या-मेंढ्याच्या छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव आला होता. मात्र कमी अनुदान असल्यामुळे तेथे छावणी सुरूच झाली नाही. राज्यात शेळ्यांची संख्या सुमारे तीस ते बत्तीस लाख तर मेंढ्यांची संख्या २२ लाखांच्या घरात आहे.   शेळ्या जगवताना शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. चारा मिळत नसल्याने जोपासणे अवघड झाले आहे. राज्यातील शेळ्या-मेंढ्याची संख्या मोठी असताना सरकारने त्या जगवण्यासाठी आजिबात त्यासाठी प्रयत्न केल्यानेच दिसत नाही. त्यामुळे शेळ्या-मेंढया पालक हतबल आहेत. - काशिनाथ अनभुले, शेळीपालक, घुमरी, ता. कर्जत, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com