लोकसहभागातील छावणीत शेळ्या-मेंढ्या घेणार

शासन उपाययोजना करेल तेव्हा करेल, शेतकऱ्यांची जनावरे तर जगली पाहिजे. म्हणून छावण्या सुरू केल्या. आम्ही प्रस्ताव दाखल केलेत, पण त्यातील सुमारे २६ अटी व शर्ती पाहता शासनाला छावण्या लवकर सुरू करायच्या नाहीत असे दिसतेय. - साईनाथ घोरपडे, वैजुबाभूळगाव, ता. पाथर्डी
छावणी
छावणी

नगर ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना जनावरे जगवण्यासाठी उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे पाथर्डी तालुक्‍यात सुरू झालेल्या लोकसहभागातील छावण्यांत जनावरे वाढत आहेत. बैजुबाभूळगाव येथील छावणीत २४०, तर खोजेवाडीतील छावणीत आडीचशे जनावरे दाखल आहेत. जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्याचाही प्रश्‍न गंभीर असल्याने खोजेवाडी १९ फेब्रुवारीपासून शेळ्या-मेंढ्यांनाही दाखल करून घेतले जाणार आहे. सुरवातीला ती संख्या शंभर असेल, असे सांगण्यात आले. नगरसह राज्याच्या अनेक भागांत पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे खरिपात नुकसान झाले. परतीचा पाऊसही आला नाही म्हणून रब्बीची पेरणीच झाली नाही. नदी, नाले, तलाव, कोरडे असून पाणीपातळी वाढीला यंदा मदत झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल-मेमध्ये कोरडे पडणारे जलस्रोत आक्‍टोबर, नोव्हेंबरमध्येच कोरडे पडले. पाणी नसल्याने शेतीचा प्रश्‍न जटील बनला. जनावरांना चारा, पाणी मिळेनासे झाले. अजून सात महिने कसे काढणार याची चिंता आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दुष्काळाची तीव्रता पाथर्डी तालुक्‍यात आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार तालुक्‍यातील चारा महिनाभरापुर्वीच संपला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला, परंतु अजून कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. जनावरांच्या छावण्या सुरू करणार की दावणीला चारा देणार हे अजून स्पष्ट नाही. सर्वाधिक तीव्रता असलेल्या पाथर्डी, शेवगाव तालुक्‍यातील शेतकरी मात्र जनावरे जगवताना त्रस्त आहे. मात्र सरकार काहीच दखल घेत नसल्याने थकलेल्या शेतकऱ्यांनी आणि समाजीक कार्यकर्त्यांनी आता स्वतःच पर्याय शोधायला सुरवात केली आहे. पाथर्डी तालुक्‍यातील खोजेवाडी येथे स्वाभीमानी शेतकरी संघटने शरद मरकड यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून आडीच महिन्यापूर्वी तर वैजुबाभूळगाव जवळ पंधरा दिवसांपूर्वी अखिल भारतीय किसान सभा आणि शिवशक्ती सांस्कृतिक समाजिक ग्रामविकास मंडळाचे साईनाथ घोरपडे यांनी छावणी सुरू केली आहे.  प्रशासनाकडून आताशी कुठे छावण्या सुरू करण्यासाठी शुक्रवार (ता. ८) पर्यत प्रस्ताव मागवले आहेत. त्यानंतर छाणणी व अन्य प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रशसानाकडून छावण्या सुरू करण्याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याने लोकसहभागातील छावणीत जनावरे दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या छावण्यांना दर दिवसाला प्रत्येकी साधारण पंधरा हजारांचा खर्च येत आहे. त्यामुळे अजून साधारण चारशे जनावरे येथे येण्याच्या प्रतीक्षेत असताना कार्यकर्त्यांना दाखल करून घेता येत नसल्याची स्थिती आहे. नेत्यांच्या फक्त भेटी लोकसहभागातून सुरु झालेल्या छावण्याला लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांसह कार्यकर्ते फक्त भेटी देतात. लोकसहभागातून छावणी चालवत असल्याने चालकांचे कौतुक करतात, सरकारच्या नाकर्तेपणावर बोलून निघून जातात. मात्र मदतीचा हात देण्याचे औदार्य अजून तरी नेत्यांनी दाखलवे नाही. वैजुबाभूळगाव येथील छावणीला नाम फाउंडेशनने तर खोजेवाडीत खासदार राजू शेट्टी यांनी चारा भेट दिला. आता दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीवर छावण्या सुरू आहेत. प्रतिक्रिया

आम्ही सर्वप्रथम लोकसहभागातून छावणी सुरू केली. शेतकऱ्यांना आता तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून अजून कसल्याही हालचाली होत नाही. शासन आणि नगरचे प्रशासन आमच्या छावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसापासून (१९ फेब्रुवारी) शेळ्या-मेंढ्यांनाही छावणीत दाखल करून घेणार आहोत. - शरद मरकड, खोजेवाडी, ता. पाथर्डी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com