ऊसदरावरून सरकार, संघटना आमनेसामने

वारणेच्या कष्टकरी परिषदेत मुख्यमंत्र्यांनी साखरेच्या दराबाबत केंद्र शासनाकडे विनंती करतो, असे आश्‍वासन दिले आहे. प्रत्यक्षात ते ऊसदराबाबत काही बोलले नाहीत. त्यामुळे त्यांनी फसविले म्हणाऱ्या खासदार शेट्टी यांनी दडपशाहीने आंदोलन न करता केवळ शेतकऱ्यांना आवाहन करावे. साखर कारखानदार आणि त्यांनी एकत्रित बसून चर्चा करावी, वस्तुनिष्ठ मागणी करावी, दडपशाहीने आंदोलन सुरू ठेवले तर राज्य शासन गप्प बसणार नाही.- - चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री
ऊसदरावरून सरकार, संघटना आमनेसामने
ऊसदरावरून सरकार, संघटना आमनेसामने

कोल्हापूर: दिवाळीच्या धामधुमीनंतर आता पुन्हा ऊस हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी रविवारी (ता. ११) कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत बंद पाळून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यात सातत्याने हिंसक आंदोलने सुरू आहेत. तर दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन केल्यास शासन गप्प बसणार नाही, असा इशारा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. त्यामुळे आता ऊसदराच्या प्रश्‍नावरून सत्ताधारी आणि शेतकरी संघटना आमनेसामने आले आहेत. शेतकरी संघटनांच्या मागणीनुसारचा दर कारखाने जाहीर करतील का? किंवा याबाबतीत मध्यस्‍थी कोण करेल हे प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने मध्यस्‍थी करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र दोन्हीकडून मागणी आल्यास यंदाही मध्यस्‍थी करून तोडगा काढण्याची सहमती दाखविली आहे. पण त्यांना कारखानदार किंवा संघटना विनंती करतील का हे पाहाणे उत्सुकतेचे आहे. दरम्यान शेतकरी संघटनांनी दडपडशाहीने आंदोलन केल्यास सरकार गप्प बसणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने याला संघटना काय उत्तर देतात याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम पूर्णपणे बंद आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या काही दिवसांत हंगाम सुरू केल्यासच वेळेत हंगाम संपेल अन्यथा तो लांबण्याची शक्‍यता असल्याने कारखाने आता जास्त काळ कारखाने बंद ठेवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साखरेचा किमान विक्री दर २९०० ऐवजी ३००० रुपये क्विंटल करतील अशा चर्चा कारखानास्तरावर होत्या. परंतु याबाबतही कोणताच निर्णय झाला नाही. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी रविवारी (ता. ११) कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत बंद पाळून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यात सातत्याने हिंसक आंदोलने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील दोन दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी सर्व पातळीवर घडामोडी होण्याची शक्‍यता आहे.  सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सांगली जिल्ह्यात गुरुवारी (ता. ८) रात्रीपासून आंदोलनाचा भडका उडाला. इस्लामपूर येथील कामेरी गावात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस जाळल्याची घटना घडली. तसेच आष्टा आणि मिरज तालुक्यांतही आंदोलन झाले. शुक्रवारी (ता. ९) सकाळपासून जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पसुल तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवरात जाऊन ऊस तोड बंद पडल्या. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून टायर फोडली जात आहेत. कोल्हापुरात आज बैठक कारखाने जास्त काळ बंद ठेवणे परवडत नसल्याने कारखानदारांनी या प्रश्‍नी चर्चा करण्यासाठी आज (शनिवारी) पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत कारखानदार हंगाम कधी सुरू करायचा, कितपत पहिला हप्ता परवडेल याबाबत चर्चा करणार आहेत. ही बैठक कारखानदारांनी बोलाविली असली तरी कारखाना प्रतिनिधींना केवळ बैठकीस उपस्थित राहाण्याबाबतच कळविण्यात आले आहे. कोणता दर देणे शक्य आहे याबाबत बैठकीतच चर्चा होण्याचा अंदाज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com