स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा केंद्राचा दावा फसवा : किसान सभा

स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च काढताना बियाणे, खते, कीटकनाशके यासह सर्व निविष्ठा (A२), कुटुंबाची मजुरी(FL) व व्याज, विमा हप्ता, जमिनीचे भाडे या सर्व बाबी एकत्र धरून सर्वंकष उत्पादन खर्च (C२) काढून यावर आधारित दीडपट भाव जाहीर करणे अपेक्षित होते.
Hamibhav
Hamibhav

नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च काढताना बियाणे, खते, कीटकनाशके यासह सर्व निविष्ठा (A२), कुटुंबाची मजुरी(FL) व व्याज, विमा हप्ता, जमिनीचे भाडे या सर्व बाबी एकत्र धरून सर्वंकष उत्पादन खर्च (C२) काढून यावर आधारित दीडपट भाव जाहीर करणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने २०२०-२१चे भाव जाहीर करताना केवळ निविष्ठा व कुटुंबाची मजुरी धरूनच भाव जाहीर केले आहेत. सर्वंकष उत्पादन खर्च धरण्यात आलेला नाही. यामुळे जाहीर झालेले भाव स्वामीनाथन सुत्राप्रमाणे असल्याचा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे.  कृषिमंत्र्यांनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने १४ पिकांच्या आधारभावात भरीव वाढ केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात ही वाढ अनेक प्रमुख पिकांच्या संदर्भात मागील दोन वर्षांच्या वाढीच्या तुलनेत कमी आहे. भाताच्या आधारभावात मागील वर्षी ६५ रुपयांची वाढ केली होती. २०१८-१९ मध्ये यात २०० रुपयांची वाढ होती. या तुलनेत आता ५३ रुपयांची करण्यात आली. ज्वारीच्या आधारभावात मागील वर्षी १२० रुपये, तर २०१८-१९मध्ये ७३० रुपयांची वाढ होती. आता केवळ ७० रुपये वाढ आहे. इतर पिकांच्या बाबतीत वाढलेला उत्पादन खर्च पाहता वाढ तुटपुंजीच असल्याचे म्हटले आहे.  लॉकडाऊनमूळे वितरण व्यवस्था कोलमडून पडल्यामुळे बियाणे, खते, औजारे, मजुरीसह सर्वच बाबींचे दर वाढल्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. आधारभावात मात्र बहुतांश पिकांबाबत मागील वर्षीच्या वाढीच्या तुलनेत कमी वाढ करण्यात आल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पॅकेजची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी तेलबिया उत्पादकांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहणार असे सांगितले. खाद्यतेलाबाबतचे परावलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया उत्पादनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांच्या आधारभावात भरीव वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र यासाठी भरीव काहीच नसल्याचे सांगण्यात आले आहे.  केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन सर्व पिकांच्या आधारभावात वाढ करावी, रास्त उत्पादन खर्च काढून यानुसार दीडपट आधारभाव जाहीर करावा व यानुसार पुरेशी खरेदी यंत्रणा उभारावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत यांच्यासह किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com