अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही महिने मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील आहे. लवकरच द्राक्ष उत्पादकांना न्याय दिला जाईल. यासह दर्जेदार द्राक्ष निर्यात होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सहकार्य केले जाईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
सध्या पूर्वहंगामी द्राक्ष काढणी हंगाम सुरू आहे. यावेळी भुसे यांनी पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील द्राक्ष उत्पादक व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नाशिक विभागाचे संचालक कृष्णा भामरे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. जिल्हा परिषद माजी सदस्य पप्पू बच्छाव, रामदास भामरे, राजाराम भामरे, रवींद्र भामरे, तात्या भामरे, विठोबा भामरे, संदीप भामरे, एकनाथ भामरे, सोपान भामरे, तुकाराम भामरे, सुनील निकम, नानाजी भामरे आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांना नुकसान भरपाई व पीकविमा मिळावा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना जाचक अटी रद्द करून कमी वेळात कर्ज मिळावे, बागलाण तालुक्यात हवामान केंद्राची उभारणी करावी, फळबाग व इतर भाजीपाला पिके ठेवण्यासाठी शीतगृह तयार करावी, आदी विषयावर चर्चा झाली.
निर्यात मूल्यात सवलत द्या
कसमादे परिसर पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनासाठी आघाडीवर आहे. या द्राक्षांची विविध देशात निर्यात होते. बांगलादेशाकडून द्राक्ष निर्यात करण्यासाठी जो मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो, त्या करात सवलत जाहीर केल्यास द्राक्ष उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळतील. त्यामुळे द्राक्ष निर्यातीसाठी निर्यात मूल्यात सवलत द्या, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.