रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध

या पूर्वीच देशांतर्गत सोयाबीन दर घटू नये म्हणून केंद्र सरकारने आयात शुल्क वाढून ते कायम ठेवून शेतकऱ्यांकरिता उत्तम निर्णय घेतला होता. आता रिफाइन्ड तेल आयातीच्या मुक्त धोरणावर निर्बंध आणून अत्यंत चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उचललेले हे हितकारी पाऊल आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.
palm oil
palm oil

नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाइंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी बुधवारी (ता. ८) दिली.   आशियान देशांसोबत केलेल्या व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून या देशांतून आयात होणाऱ्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाली आहे. त्यामुळे आयात वाढून देशांतर्गत रिफायनरी उद्योगाला याचा फटका बसण्याची शक्यता उद्योगाने व्यक्ते केली होती. त्यामुळे रिफायनरी उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकार रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर निर्बंध घालण्याच्या विचारत होते. त्यानुसार बुधवारी (ता. ८) केंद्र सरकारने रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामतेल आणि रिफाईंड, ब्लिचड् आणि गंधमुक्त पामोलिनची आयातीवर निर्बंध घातल्या आहेत.   आशियान देशांशी झालेल्या व्यापार करारानुसार भारताने या देशांमधून आयात होणाऱ्या रिफाईंड पाम तेलावरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्याचे मान्य केले होते. या करारामुळे रिफाईंड आणि कच्च्या पामतेल आयातीशुल्कातील फरक हा १० टक्क्यांवरून २.५ टक्क्यांनी कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार होती. त्यामुळे देशातील रिफानरी उद्योगाने रिफाईंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध घालण्याची मागणी केली होती.  रिफाईंड तेलाच्या आयातीत २८ टक्क्यांनी वाढ भारताच्या तेल आयातीचा विचार करता आधीच रिफाईंड खाद्यतेलाची आयात ही कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीपेक्षा जास्त पटीने वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात रिफाईंड पामोलिनची आयात मागील वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढून २७ लाख टन झाली. तर, कच्‍च्या पामतेलाची आयात केवळ १.२ टक्क्यांनी वाढून ६७ लाख टन झाली, अशी माहिती ‘एसईए’ने दिलेल्या आकडेवरून मिळाली.  सरकारी कंपन्यांमार्फतच आयातीचा विचार रिफाइंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध घातल्यानंतर केंद्र सरकार खाद्यतेल आयात केवळ सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच करण्याचा विचार करत आहे. रिफाइंड खाद्यतेल, विशेषतः पामतेल आयात खासगी कंपन्यांमार्फत करण्यास सरकार इच्छुक नाही. त्यामुळे केवळ सराकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच आयातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सरकार एमएमटीसी लि. आणि नाफेडला रिफाईंड खाद्यतेल आयात करण्यासाठी सांगू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com