जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून, गोदामे उपलब्ध नसल्याने नव्याने खरेदीला ब्रेक लागला आहे. तूर खरेदीवरही याचा परिणाम होऊ लागला असून, जिल्ह्यात खरेदी केलेले धान्य नवापूर (जि. नंदुरबार) येथील गोदामांमध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
हरभरा खरेदी येत्या सोमवारपासून सुरू होईल, असे संकेत आहेत. सोमवारपर्यंत खरेदी केलेली तूर, उडीद, मूग व इतर धान्य इतरत्र हलविले जाईल. जिल्ह्यात पारोळा व भडगाव वगळता सर्व १३ तालुक्यांमध्ये वखार महामंडळाची गोदामे आहेत.
या गोदामांमध्ये मागील वर्षी खरेदी केलेली तूर व इतर कडधान्य, सोयाबीन व मका पडून आहे. त्यातच यंदा खरेदी केलेली तूरही पडून आहे. गोदामे भरली असून, नव्याने धान्य खरेदी करून ते कुठे साठवायचे, हा प्रश्न शासकीय यंत्रणांसमोर आहे. यामुळे हरभरा खरेदीचा मुहूर्तही लांबणीवर पडत आहे.
हरभरा खरेदीची तयारी १० दिवसांपूर्वीच सुरू झाली. तीन हजार शेतकऱ्यांचे ऑफलाइन अर्ज शेतकी संघांमध्ये स्वीकारले आहेत. तसेच १२ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यात पारोळा, भडगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव, पाचोरा, अमळनेर व चाळीसगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातील ११ केंद्रांना प्रशासनाने मंजुरी दिली असून, पारोळा येथील प्रस्तावित केंद्राला अजून मंजुरी मिळालेली नाही.
जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन आले असून, त्याचे दर मात्र बाजारात अतिशय कमी आहेत. २८०० ते ३४०० रुपये क्विंटल असे दर हरभऱ्याला बाजार समिती व इतर खासगी ठिकाणी आहेत. शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीसाठी निश्चित केला असून, शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत आहेत.