ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या उपाययोजना

सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांतील द्राक्ष बागेत विविध समस्या येऊ शकतात. त्या जाणून घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात.
The problem of grape bead rot and powdery mildew symptoms
The problem of grape bead rot and powdery mildew symptoms

सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांतील द्राक्ष बागेत पुढील प्रमाणे समस्या येऊ शकतात. त्या जाणून घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात. मुळांचा विकास महत्त्वाचा द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर जेव्हा द्राक्ष घड बाहेर पडतो, तेव्हा त्या घडाच्या वाढीकरिता (प्रीब्लूम अवस्थेतील घड) लागणारे अन्नद्रव्य नवीन कोवळ्या फुटीतून घेतले जाते. मात्र या फुटीवर निघालेली पाने प्रकाश संश्‍लेषणाकरिता समर्थ नसल्यामुळे अन्नद्रव्याचा साठा फुटींमध्ये नसेल. म्हणजेच या अवस्थेतील घडाच्या विकासाकरिता त्वरित मिळणारे अन्नद्रव्य त्या छाटलेल्या काडीमधूनच घेतले जाईल. परंतु काडी परिपक्वतेच्या अवस्थेत (गेल्या हंगामात) पाऊस जास्त झाल्याने व तितकाच काळ ढगाळ वातावरणामुळे वेलीला आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळाला नाही. म्हणून या अवस्थेत त्या काडीमध्येसुद्धा अन्नद्रव्य पुरेसे नसेल. या परिस्थितीवर मात करण्याकरिता या वेळी मुळांचा विकास महत्त्वाचा असेल. बागेमध्ये कुदळ किंवा खुरप्यांच्या साह्याने बोद मोकळे करून घ्यावेत किंवा बोदाच्या बाजूने ट्रॅक्टरच्या साह्याने चारी घेऊन या भागात नवीन मुळे तयार होतील, असे नियोजन करावे. बोद मोकळे करण्यातून जुनी मुळे पाच टक्क्यांपर्यंत तुटली असल्यास पंधरा ते वीस टक्के नवीन पांढरी मुळे तयार होण्याची शक्यता असते.  पुढील काळामध्ये थंडी सुरू होण्याची शक्यता आहे. बागेतील तापमानसुद्धा तितकेच कमी होईल. त्यानंतर घडाचा विकास होणार नाही. या करिता मुळांवर आच्छादन (मल्चिंग) फायद्याचे राहील. यामुळे बोदामधील तापमान वाढण्यास मदत होईल. तेव्हा ज्या बागेत भारी जमीन आहे, अशा ठिकाणी पाण्याचा वापर कमी करता येईल. पाण्याचा वापर कमी केल्यास बोदातील मुळे कार्यक्षम राहण्यास मदत होईल.  घडाची, तसेच मण्याची विरळणी या वर्षी बऱ्याच बागेत विविध समस्यांमुळे घड जिरण्याची व कुजेची समस्या जास्त प्रमाणात दिसून आली. त्यामुळे येत्या हंगामामध्ये घडांची संख्या आटोक्यात असेल किंवा काही ठिकाणी ती गरजेपेक्षा कमी असेल. ज्या बागेत घडांची संख्या जास्त आहे, अशा बागेमध्ये वेळीच विरळणी करून घेतल्यास पुढील काळात घडाच्या विकासासाठी फायदा होईल. 

  • यासाठी बागेत आपल्या उद्देशानुसार घडांची संख्या निर्धारित करावी. उदा. स्थानिक बाजारपेठेकरिता ०.७५ ते १ घड प्रति वर्गफूट वेलीच्या क्षेत्रफळानुसार, निर्यातक्षम द्राक्षासाठी १ द्राक्ष घड प्रति दीड वर्गफूट क्षेत्रफळाकरिता, तर बेदाण्याकरिता दीड ते दोन द्राक्षघड प्रति वर्गफूट क्षेत्रफळाकरिता असावा. 
  • काडीच्या जाडीनुसारसुद्धा द्राक्ष घडांची विरळणी करता येईल.  उदा. ६ मि.मी. जाडीच्या काडीकरिता एक घड, ६ ते ८ मि.मी. जाडीकरिता एक घड अधिक एक पोषण करणारी फूट, तर ८ ते १० मि.मी. जाडीकरिता दोन घड व एक पोषण करणारी फूट अशा प्रकारचे नियोजन करता येईल. घडाची विरळणी करताना शक्यतोवर एकाच वेळी निघालेले व एकाच आकाराचे घड राखून इतर घड काढून घेता येतील. असे केल्यास पुढील काळात (प्रीब्लूम अवस्थेत) १० पीपीएम जीएची फवारणी करणे सोपे होईल.
  • घडातील मण्याची विरळणी करतानासुद्धा द्राक्षजातीनुसार विरळणीचा निर्णय घेणे हिताचे असेल. उदा. थॉमसन, तास- ए- गणेश, क्लोन २, सुधाकर सीडलेस इ. जातींमध्ये १०० ते १२० मणी पुरेसे होतील. तर नानासाहेब पर्पल या द्राक्षजातीत मण्याचा आकार जास्त असल्यामुळे प्रत्येक घडात ७० ते ८० मणी पुरेसे होतील. 
  • स्थानिक बाजारपेठेकरिता वापरात असलेल्या द्राक्षजातींसाठी मण्याची संख्या यापेक्षा जास्त असेल. उदा. लांब मण्यांच्या द्राक्ष जाती. या जातीमध्ये १२० ते १४० मण्यापेक्षा जास्त मणी नसावेत. 
  • मणी गळ होण्याची समस्या बऱ्याचशा बागांमध्ये होत असलेल्या विविध बदलांमुळे वेलीवर जास्त ताण  पडत असल्याचे दिसून येते. फुलोरा अवस्थेच्या पूर्वीची अवस्था म्हणजे दोडा अवस्था. या अवस्थेत वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे उदा. ढगाळ वातावरण, जास्त तापमान, वेलीला बसलेला पाण्याचा ताण, वेलीत वाढलेले जिब्रेलिन्सची मात्रा या बाबी दोडा अवस्थेतील गळीसाठी कारणीभूत असतात. या परिस्थितीतील द्राक्ष बागेत पुढील काळजी घ्यावी.

  • वेलीला ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषतः थिनिंग चांगले मिळण्याकरिता हलक्या जमिनीत आपण पाण्याचा ताण देतो. मात्र नेमके पाणी किती लागते, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा बागेत दोडा अवस्थेत गळ जास्त होते. 
  • ज्या बागेत शेंडा वाढ जास्त आहे, अशा ठिकाणी शेंडा पिंचिंग करून घ्यावे. काही परिस्थितीत शेंडा थांबला असेल, पण गळ होत असल्याचे दिसत आहे. अशा बागेत शेंडा मारणे आवश्यक असेल. 
  • वेलीस सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी फायद्याची राहील.
  • रोगांचा प्रादुर्भाव

  • सध्याच्या बदलत्या वातावरणात तापमानात हवी तितकी घट झालेली नसल्याने डाऊनी मिल्ड्यू रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी असेल. मात्र जर पाऊस आला, तर काही काळाकरिता तापमानही कमी होईल. दुपारी बागेत आर्द्रता सुद्धा वाढेल, अशा स्थितीत या पूर्वी उपलब्ध असलेल्या डाऊनी मिल्ड्यूच्या बीजाणूंची वाढ होईल. तेव्हा बागेतील परिस्थितीनुसार रोगनियंत्रणाचा निर्णय घ्यावा.
  • या वातावरणामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असेल. प्रीब्लूम अवस्थेतील बागेत भुरीच्या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी असली, तरी मणी सेटिंग झाल्यानंतरच्या अवस्थेतील बागेत अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फवारणी प्रति लिटर पाणी 
  • सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मि.लि. किंवा डायफेनोकोनॅझोल ०.५ ते ०.७ ग्रॅम.
  • संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com