पावसाळ्यातील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष वेलीची वाढ जोमात असेल. पाऊस आणि हवामानानुसार वेलीवर नवीन फुटी दिसतात. या फुटी वाढू दिल्यास काडीमधील अन्नद्रव्ये वाया जाण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेऊन बागेचे नियोजन करावे.
 drainage of water is necessary in grapes garden
drainage of water is necessary in grapes garden

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष वेलीची वाढ जोमात असेल. पाऊस आणि हवामानानुसार वेलीवर नवीन फुटी दिसतात. या फुटी वाढू दिल्यास काडीमधील अन्नद्रव्ये वाया जाण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेऊन बागेचे नियोजन करावे. पावसाळ्यामध्ये द्राक्ष बागेत निचऱ्याची समस्या, अनियंत्रित वेलींची वाढ, ओलांड्यावरील मुळ्या, वेलींचे आरोग्य, रोग- किडींचा प्रादुर्भाव, पक्वतेतील उशीर, काडी तयार होण्यास लागणारा विलंब आणि तणांची वाढ यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. सध्या बागांमध्ये सूक्ष्मघडनिर्मिती होऊन फळधारक डोळ्यांची वाढ किंवा काडीची पक्वता या अवस्थेत असल्याचे दिसून येते. फुटींच्या वाढीवर नियंत्रण 

  • ढगाळ वातावरणामुळे वाढ जोमात असेल. पाऊस आणि हवामानानुसार वेलीवर नवीन फुटी दिसतात. या फुटी वाढू दिल्यास काडीमधील अन्नद्रव्ये वाया जाण्याची शक्‍यता असते. नवीन फुटी जास्त वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • वाढ नियंत्रणामुळे काडीस पक्वता मिळण्यास मदत होते. बागेतील पाणी कमी करावे. नवीन फुटींचे पिंचिंग करून वेलीवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
  • पावसाळ्यामध्ये नवीन फुटी जास्त काळ चालत राहिल्यास या फुटींच्या वाढीकरिता लागलेले अन्नद्रव्ये हे पक्वतेकडे असणाऱ्या काडीतून जाईल आणि ती काडी अशक्त होईल. तेव्हा नत्र देणे पूर्ण बंद करावे.
  • बागेचे व्यवस्थापन 

  • पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये वाफसा स्थिती राहील याकडे लक्ष द्यावे.
  • पाण्याचा निचरा होण्यासाठी बागेच्या समांतर चर काढावेत. चर काढल्याने जमिनीमध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण पाण्यातून वाहून गेल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात पोषक वातावरण बनते.
  • काही विभागामध्ये एप्रिल छाटणी उशिरा घेतली जाते. त्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीला बाधा येते.
  • पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरणात पानांची शोषण क्रिया कमी झालेली असते. म्हणूनच पावसाची उघडीप पाहूनच फवारण्या कराव्यात.
  • पावसाळ्यातील आगंतुक मुळे विकसित होण्याची मुख्य कारणे अजूनपर्यंत लक्षात आली नसली तरी वातावरणातील बदल तसेच पाण्याचा निचरा न होण्याची समस्या बहुतेक भारी काळ्या जमिनीत जाणवते. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यास वेलींची मुळे सडतात. तसेच नवीन मुळांची निर्मिती थांबते. त्यामुळे वेलींच्या ओलांड्यावर व खोडावर मुळांची वाढ दिसते. मुळांच्या कार्यक्षेत्रात वर्षभरात दिल्या जाणाऱ्या खत व पाण्याच्या माध्यमातून बरेचसे क्षार जमा झालेले असतात. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होताना हे क्षार वाहून जातात. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अधिकच महत्त्व आहे.
  • फुटींची जास्त वाढ ही हानिकारक ठरते. कारण यापूर्वीच आपण ठरवलेल्या गुणोत्तराप्रमाणे वेलींवर काड्यांची संख्या व काडीवरील पानांची संख्या निर्धारित केलेली असते. अनियंत्रित वाढीमुळे झालेल्या काडीवर घडनिर्मितीची जागा पुढे पुढे सरकत जाऊन घडाचा आकार लहान होतो. सूक्ष्म घडांचे पोषणही होत नाही. म्हणून काडीच्या पक्वतेच्या काळात अशी वाढणारी फूट व जास्त निघणारी पाने शेंडा पिंचिंग करून काढून घ्यावीत.
  • विविध प्रकारच्या ताणामुळे वेलीतील संजीवकांच्या पातळीत तसेच वाहनावर परिणाम दिसून येतो. सायटोकायनीन संजीवकांची निर्मिती मुळांमध्ये होते. ते जलवाहिन्यांद्वारे पानांपर्यंत वाहून नेले जाते. जेव्हा पावसामुळे दलदलयुक्त परिस्थिती निर्माण होते तेव्हा ऑक्‍झीनची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये वेलींमधील सायटोकायनीन निर्मिती आणि वहनावर परिणाम होतो. तसेच पर्णरंध्रामध्ये प्रतिरोध वाढतो, पानांची वाढ लगेच थांबते.
  • दोन वेलींमधील १.५ ते २ फुटांपर्यंतचा पट्टा खुरपून तणविरहित करणे आवश्‍यक आहे. कारण तेथे ठिबकचे पाणी, खते उपलब्ध होत असल्याने तणांची वाढ जोमाने होते. तणे शक्‍यतो फुलोऱ्यापुर्वी खुरपून काढल्यास नंतरची वाढ लवकर होत नाही.
  • फळछाटणी 

  • पावसाळी हवामानात फळछाटणी घेतल्यास जमिनीत वाफसा स्थिती निर्माण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. बागेत चर काढावेत.
  • वाढीचा जोम जास्त असल्यास ठरावीक अंतराने टॉपींग करावे.
  • सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर करून जमीन भुसभुशीत राखावी.
  • सततच्या पावसामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो, त्यामुळे अधून मधून अन्नद्रव्यांची पूर्तता करावी.
  • बोधावर आच्छादन करावे. त्यामुळे गवताचे प्रमाण कमी होऊन अन्नसाठ्यात वाढ होते.
  • पोषक हवामान असल्याने नवीन फुटींची वाढ होत राहते. त्या वेळोवेळी काढून टाकाव्यात. परंतु हार्ड पिंचिंग करू नये.
  • एकसारख्या जाडीच्या काड्या ठेवाव्यात. इतर कोवळ्या फुटी काढून टाकाव्यात.
  • फळछाटणी आधी अन्नद्रव्य साठवून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी वेळोवेळी शेंडा पिंचिंग करावा. जेणेकरून अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणार नाही.
  • फळछाटणीनंतर गोळी घड तयार होऊ नये यासाठी शेंडा खुडावा.
  • संपर्क- डॉ. एस.डी.रामटेके, ७९७२९७०५६१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी,जि.पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com