सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर 

जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणीस प्रारंभ होतो. फळ छाटणीची तयारी पूर्ण झाली असली तरी यंदाच्या द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरचे सावट निर्माण झाले आहे.
grapes
grapes

सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणीस प्रारंभ होतो.  फळ छाटणीची तयारी पूर्ण झाली असली तरी यंदाच्या द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून छाटणीस प्रारंभ होण्याचा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.  जिल्ह्यात सुमारे १ लाख २५ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड आहे. वास्तविक पाहता दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ली फळ छाटणी घेण्यास सुरुवात होते. ही फळ छाटणी मिरज तालुक्याच्या पूर्व भागात होते. सप्टेंबरच्या पंधरा दिवसात १० ते१५ टक्के क्षेत्रावरील फळ छाटणी पूर्ण होते. त्यानंतर फळ छाटणीस गती येते. सप्टेंबर अखेर ६० ते ७० टक्के फळ छाटणी पूर्ण होते. उर्वरित छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होते. मुळात द्राक्ष बाजारपेठेत लवकर आली की त्याला अपेक्षित दर मिळतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आगाप फळ छाटणीस प्राधान्य देतो. नाताळ सणाच्या दरम्यान द्राक्षे बाजारात विक्रीस येतात. मात्र, गेल्यावर्षी अतिपावसाने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. यंदाही हवामान खात्याने अतिवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकरी धास्तावले. परंतु पावसाला उशिरा सुरुवात झाली. द्राक्ष पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येत होता. परंतु पावसाने उघडीप दिली. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये फळ छाटणीचे नियोजन सुरु केले. ऑक्टोबरमध्ये होईल प्रारंभ गतवर्षी परतीच्या पावसाने द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने फळ छाटणी थांबवली. त्यातच मजुरांचा प्रश्न भेडसावत होता. यंदाच्या द्राक्ष हंगामावर सातत्याने बदलत्या वातावरणाचे सावट असल्याने सप्टेंबरमध्ये सुरु होणारी फळ छाटणी निम्मा महिना संपला तरी अजून सुरु झाली नाही. यामुळे फळ छाटणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. प्रतिक्रिया गेल्यावर्षी पावसाने बागांचे मोठे नुकसान झाले. त्यात यंदाही द्राक्ष पिकाला पोषक असे वातावरण नाही. द्राक्ष हंगामावर बदलत्या वातावरणाचे सावट असल्याने शेतकरी हवामानाचा अंदाज घेत आहेत. - सतीष जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनी, ता. मिरज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com