नाशिक : यंदा पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून सततच्या पावसामुळे डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावामुळे माल जिरणे व गळकूजमुळे उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आता माल काढणीस आला असून, दिवाळीनंतर दरात सुधारणा झाली. मात्र उत्पादन घटल्याने हंगामात शेतकऱ्यांना २०० कोटींचा फटका बसला आहे.
उत्पादनात अधिक जोखीम, अधिक दर अशी स्थिती असते. त्यामुळे नुकसानीची कल्पना असूनही कसमादे भागात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तयार द्राक्ष मालाला तडे जाऊन द्राक्ष घडांची वेलीवरच सड झाली होती. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५८ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. त्यापैकी सटाणा, मालेगाव, कळवण व देवळा तालुक्यात कसमादे भागात १५२२ हेक्टरवर क्षेत्र आहे. त्यापैकी १२०० हेक्टरवर पूर्वहंगामी लागवडी तसेच उर्वरित नियमित हंगाम घेतला जातो. तर काहींनी नुकसान वाढल्यामुळे बागाही तोडल्या आहेत. त्यातच माल जिरणे, गळकुज या अडचणींमुळे उत्पादन खर्च वाढला असताना अपेक्षित उत्पादन घटले.
दिवाळीपूर्वी तयार मालाचे सौदे होऊन सध्या काढणीची लगबग सुरू आहे. आता मागणी वाढत असताना मालाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे दर चांगले आहेत. त्यामुळे या परिस्थितीत ‘काही कमावलेही नाही अन् गमावलेही नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हवामानात बदल होत असल्याने जोपर्यंत सौदे होऊन काढणी होत नाही, अन् पैसे हातात मिळत नाहीत; तोपर्यंत ही धाकधूक कायम आहे. सरासरी दर १०० रुपयांवर २०० कोटींवर फटका सध्या ३ हजार एकरांवर हंगाम घेतला आहे. त्यास मिळणारा दर हा सरासरी १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. त्यातच ७० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट आहे. त्यामुळे एकरी सरासरी ७ क्विंटल माल कमी येऊन उत्पादन घटले आहे. सध्याचा दर व क्षेत्राचा विचार केल्यास झालेल्या नुकसानीमुळे २०० कोटींवर फटका बसला आहे. सध्या देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत दिल्ली बाजारासह नेपाळमध्ये मागणी आहे. त्यातुलनेत माल कमी असल्याने रशियात होणारी निर्यात मंदावली आहे. परिणामी, चालू वर्षीही पूर्वहंगामी द्राक्ष निर्यात घटणार असल्याची स्थिती आहे. असे आहेत दर
वाण | किमान | कमाल | सरासरी |
सफेद | ८० | १०० | ९० |
काळा | १२० | १५० | १३० |
हंगामाची सद्यःस्थिती
प्रतिक्रिया जून अखेर व जुलैच्या पहिल्या आठवड्यात गोडी बहर छाटणी केलेले प्लॉट सुरुवातीला डाऊनी व भुरी रोगांमुळे जिरले. तर नवरात्राच्या काळात तयार मालाला पावसामुळे तडे जाऊन नुकसान झाले. नंतरच्या प्लॉटमधील माल चांगला राहिला. मागील वर्षीच्या तुलनेत उलटे होते. मात्र नंतर दर मिळाल्याने खर्च पाणी निघाला आहे. नफा मात्र नाहीच. - चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक, वायगाव, ता. सटाणा चालू वर्षी सुरुवातीपासूनच वातावरण बदलामुळे डाऊनी, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन ७० टक्क्यांपर्यंत घटले आहे. सध्या दर चांगले आहेत, मात्र माल कमी निघाला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळणार नाही. - खंडेराव शेवाळे, द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. सटाणा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.