द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि कर्जही मिळेना

द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज दोन लाखाच्या पुढे अडीच किंवा तीन लाखापर्यंत जात असल्यान राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत त्याचा समावेश न झाल्यामुळे बागायतदार अत्यंत अडचणीत आले आहेत.
grapes
grapes

नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  दोन लाखाच्या पुढे अडीच किंवा तीन लाखापर्यंत जात असल्यान राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत त्याचा समावेश न झाल्यामुळे बागायतदार अत्यंत अडचणीत आले आहेत.  गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागायतदारां चा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे.  गेल्या तीन वर्षांपासून तर मोठा खर्च करुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेतांना मोठे नुकसान झाले. लॉकडाउनमुळे ८० रूपयांचा दर ७ ते १० रुपयांवर आले.  एकीकडे उत्पन्न नाही. त्यातच कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने, अन् समझोता योजनेत पैसे भरूनही बँका आता कर्ज देत नाहीत. त्यामुळे हंगामाच्या तोंडी भांडवल नसल्याने शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत, मात्र काही बँका प्रतिसाद देत नसल्याने त्यांची कोंडी होत असल्याची स्थिती आहे. राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले आहे. त्यामुळे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी द्राक्ष उत्पादकांना याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे द्राक्ष पिकापोटी १.१० लाख एकरी कर्ज मिळत असताना, उत्पादकांना प्रतिएकर २ लाखांवर उत्पादन खर्च करावा लागतो. त्यातच लॉकडाउनमुळे मागणी पुरवठा साखळी बिघडल्याने दरात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रतिष्ठा मिळवून देणारे खर्चीक पीक अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहे.   अजूनही द्राक्ष उत्पादकांचा माल विकुनही कोट्यवधी रुपये द्राक्ष व बेदाणा व्यापारी, निर्यातदार यांच्याकडे पैसे अटकून आहेत, त्यामुळे त्यातच पीककर्ज मिळत नसल्याने त्यांची अडचण वाढत असून हंगामाची सुरुवात समस्यांमध्ये अडकल्याने जिल्ह्यात चित्र आहे. त्यातच नेहमी द्राक्ष उत्पादक कर्जमाफीत बसत नसल्याने व आता बँकाही भांडवलासाठी पीककर्ज नसल्याने अडचणी वाढत्या आहेत.

 अशी आहे स्थिती राज्यात २ लाखांपर्यंत कर्जमाफी झाली. मात्र नाशिक जिल्ह्यात २.५ ते ३ लाखांवर द्राक्षासाठीच्या पीककर्जांचे २८२ कोटी थकीत आहेत. एकूण २ लाखांपर्यंत थकीत असलेली रक्कम ७१२ कोटी आहे. ही रक्कम जवळपास ४५ हजार खात्यांवर आहे. त्यात दोन लाखांवर थकीत असलेले शेकडो द्राक्ष उत्पादक आहेत. पीककर्ज आणि नुकसान मोठे असल्याने कर्जमाफी योजनेत २ लाखांवर कर्जाचा समावेश करण्याची, मागणी द्राक्ष बागायतदार करत आहे.

प्रतिक्रिया २०१९ एकवेळ समझोता योजनेत सहभागी झालो. ठरल्याप्रमाणे पैसे भरले, मात्र त्यात शेरा मारल्याने दुसरी बँक कर्ज देत नाही. त्यात कर्जमाफीचा लाभ मिळलेला नाही. त्यामुळे आता कर्ज नसूनसुद्धा बँका भांडवल देत नसल्याने काय करावे हा प्रश्न आहे. - श्याम देवकर, द्राक्ष उत्पादक, राजापूर, ता. दिंडोरी

शासन नेहमी प्रमुख शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. द्राक्षात लाखो रुपये गुंतवून परतावा नाही. त्यातच मोजक्या शेतकऱ्यांना लाभ मिळला. अनेकजण वंचित आहोत. शासनाने अटी, शर्ती कमी करून दोन लाखांवर योजना आणावी, अन् द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा. - बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com