शेतकरी आठवडे बाजारामुळे मध्यस्थांचे उच्चाटन ः पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकरी आठवडे बाजारामुळे मध्यस्थांचे उच्चाटन ः पालकमंत्री गुलाबराव पाटील
शेतकरी आठवडे बाजारामुळे मध्यस्थांचे उच्चाटन ः पालकमंत्री गुलाबराव पाटील

परभणी ः संत शिरोमणी श्री. सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमालाची विक्री करता येणार आहे. दलाल-मध्यस्थांचे उच्चाटन होऊन शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शहरातील नागरिकांना जास्तीतजास्त दर्जेदार विशेषतः सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमाल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. १३) केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या तर्फे भरविण्यात येणाऱ्या संत शिरोमणी श्री. सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराच्या परभणी येथील शनिवार बाजार मैदानावर आयोजित उदघाटन कार्यक्रमामध्ये श्री. पाटील बोलत होते.

या वेळी महापौर मीनाताई वरपुडकर अध्यक्षस्थानी होत्या. आमदार डाॅ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, पणन मंडळाचे उपव्यवस्थापक गजानन वाघ, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पंकज चाटे, सोपानराव आवचार, बाजार समितीचे सचिव विलास मस्के, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, शेतकरी आठवडे बाजाराची आयोजक वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे दिलीप अंभुरे, माणिक अंभुरे उपस्थित होते. राज्यमंत्री पाटील पुढे म्हणाले, दलाल-मध्यस्थांचे उच्चाटन होऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शासनाने संत शिरोमणी श्री. सावता माळी आठवडे बाजार भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरुकता वाढल्याने सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढली आहे.  

डाॅ. पाटील म्हणाले, महानगरपालिकेने शेतकरी आठवडे बाजारासाठी शहरात जागा उपलब्ध करून द्याव्यात. श्रीमती वरपुडकर म्हणाल्या, शेतकरी आठवडे बाजारासाठी आणखीन तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पी. शिवशंकर म्हणाले, थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आणखी चार पाच ठिकाणी शेतकरी बाजार भरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रास्ताविक करून सूत्रसंचालन श्री. वाघ यांनी केले. तर श्री. शिंदे यांनी आभार मानले.

दर बुधवारी शेतकरी आठवडे बाजार भरणार महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या वर्णा (ता. जिंतूर) येथील वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी संत शिरोमणी श्री. सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराची आयोजक आहे. बुधवार (ता. १६) पासून प्रत्येक बुधवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत शनिवार बाजार मैदानावर भरणार आहे. शेतकरी, शेतकरी गटांनी उत्पादित केलेला दर्जेदार भाजीपाला, फळे शेतमाल थेट ग्राहकांना रास्त दरामध्ये उपलब्ध होणार आहे. मोजमापासाठी इलेक्ट्रानिक वजन काट्याचा वापर केला जाणार आहे. या शेतकरी आठवडे बाजाराचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com