‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे गुजरातमध्ये 

देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांचे उत्पादन गुजरातमध्ये होत आहे. त्यानंतर उत्पादित झालेले बियाणे महाराष्ट्रात हलविण्यात येते.
cotton seed
cotton seed

पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांचे उत्पादन गुजरातमध्ये होत आहे. त्यानंतर उत्पादित झालेले बियाणे महाराष्ट्रात हलविण्यात येते, अशी माहिती बियाणे उद्योगाने केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारात दिली आहे. 

राज्यात यंदा ७५ लाख एचटीबीटी बियाण्यांची विक्री झाल्याचा अंदाज यापूर्वीच बियाणे उद्योगाने व्यक्त केला आहे. कृषी खात्याने यापूर्वी टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे बियाणे उद्योगाच्या आरोपात तथ्य आढळून येत असल्याचे स्थानिक कंपन्यांचे म्हणणे आहे. 

देशातील प्रमुख बियाणे उत्पादक कंपन्यांचा समावेश असलेल्या फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (एफएसआयआय) एचटीबीटी बियाण्यांबाबत धक्कादायक माहिती केंद्र शासनासमोर मांडली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फेडरेशनेचे कार्यकारी संचालक शिवेंद्र बजाज यांनी केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांना दिलेल्या पत्रातून एचटीबीटीची पाळेमुळे गुजरातमध्ये असल्याचे स्पष्ट होते आहे. 

देशाच्या बियाणे बाजारपेठेत असलेल्या ६० टक्के मालाचा पुरवठा फेडरेशनशी संलग्न असलेल्या कंपन्यांकडून होत असतो. त्यामुळे फेडरेशनच्या मताकडे केंद्राला दुर्लक्ष करता येणार नाही, असे बियाणे कंपन्यांना वाटते. गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात सध्या एचटीबीटीचा प्रसार झाला आहे. पुढील हंगामात देशभर या बियाण्याची विक्री होण्याची चिन्हे आहेत. 

‘‘यंदा देशातील बाजारपेठांमध्ये एचटीबीटी बियाण्यांच्या लाखो पाकिटांची विक्री झालेली आहे. मात्र त्याहून धक्कादायक बाब म्हणजे नामांकित कंपन्यांच्या ब्रॅंड आणि पिशव्यांचा वापर करून यंदा या बियाण्यांची विक्री करण्यात आलेली आहे. त्यामुळे एखाद्या कारवाईत या पिशव्या सापडल्याच तर नामांकित कंपन्या हकनाक बदनाम होतील किंवा त्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागेल,’’ असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

‘‘एचटीबीटी बियाण्यांच्या शास्त्रीय शुद्धतेविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या बियाण्यांचा अवैधपणे वापर करणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो. शुद्ध बियाण्यांमध्ये एचटीबीटीची भेसळ होण्याची शक्यता असल्याने बियाणे कंपन्या देखील अडचणीत आलेल्या आहेत,’’ असेही फेडरेशनने कृषी मंत्रालयाला कळविले आहे.  प्रतिक्रिया  शेतकऱ्यांना कपाशींमधील तण व्यवस्थापन अतिशय खर्चिक झालेले आहे. मजूरटंचाईमुळे कपाशीत तण काढणीवर जास्त पैसे खर्च होतात. एचटीबीटीमुळे तणनाशक फवारण्याची सोय उपलब्ध होते. त्यामुळे खर्च आणि वेळ वाचतो. शेतकऱ्यांनी स्वतःहून एचटीबीटी वापरणे सुरू केले असून, जे तंत्रज्ञान सोयीचे वाटते ते मिळवून वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे आता एचटीबीटीची लाट रोखता येणार नाही. या बियाण्याला सरकारी मान्यता देण्यातच शहाणपण आहे.  - डॉ. सी.डी. मायी, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com