पूर्व विदर्भात गारपीट

गारपीट
गारपीट

पुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार झालेल्या वाऱ्याच्या संगमामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी बुधवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला असून वर्धा जिल्ह्यात वीज कोसळ्याने दोघांचा मृत्यू झाला. अवेळी झालेल्या जोराच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, आंब्याच्या कैऱ्या, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले.   पूर्व विदर्भात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काही अंशी ढगाळ हवामान झाले. यामुळे अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरील लावली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात धपकी शिवारात गावातील देंवेद्र कवडू सहारे व सत्तार शेख हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. पावसापासून संरक्षण होण्यासाठी झाडाखाली उभे असताना त्याच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर गिरड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, मोहगाव, वरठी, लाखनी तसेच जवाहरनगर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा, गोंदिया शहर, नागपूर जिल्ह्यामधील सावनेर तालुक्यातील केळवद परिसर, रामटेक, मौदा, पारशिवनी, काटोल तालुक्यांतील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला गहू, हरभरा पिकांसह संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच विविध तालुक्यांत अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळे आले होते. काटोल तालुक्यातील संत्रा रोपवाटिकानाही गारपिटीचा मोठा फटका बसला. तर आजनगाव येथे निळकंठ कुकडे यांचे घर वादळी पावसामुळे व गारपिटीने कोसळले. मौदा तालुक्यातील मिरची उत्पादकांनाही गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. होळीच्या दिवशी पाऊस झाल्याने कापणीवर आलेला गहू वादळी पावसाने जमीनदोस्त झाला. त्यामुळे होळी सणावर विरजण पडल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.  पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गुरुवारी (ता. २१) दिवसभर या भागात काही अंशी ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात उकाडा तयार होऊन कमाल तापमानात वाढ झाली होती. गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ४०.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर अमरावती, बुलढाणा, वाशीम, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागांतील कमाल तापमान ३४ ते ३९ अंश सेल्‍सिअसच्या दरमान होते. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांतही वाढलेल्या तापमानामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता कर्नाटकाचा उत्तर भाग ते मध्य महाराष्ट्राचा परिसर ते तेलंगण या दरम्यान समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच विदर्भातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.         गुरुवारी (ता. २१) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७ (१५.१), नगर ३९.८ (१५.०), जळगाव ३८.२ (१९.०), कोल्हापूर ३६.६ (१९.८), महाबळेश्‍वर (१६.६), मालेगाव ३९.० (१८.६), नाशिक ३५.० (१५.६),  सांगली ३७.६ (१६.४), सातारा ३७.१ (१७.६), सोलापूर ३९.९ (२१.५), सांताक्रुझ ३१.६ (२०.५), अलिबाग (२०.३), रत्नागिरी ३१.४ (२१.३), डहाणू  (२०.०), औरंगाबाद ३७.४ (१७.६), नांदेड ३९.५, अकोला ४०.० (२२.८), अमरावती ३९.८ (१९.८), बुलडाणा ३६.२ (२१.०),  ब्रह्मपुरी ३६.२ (१९.३), चंद्रपूर ३७.८ (२३.६), गडचिरोली ३४.० (२३.०), गोंदिया ३४.४ (१६.०), नागपूर ३७.१ (२०.२), वर्धा ३७.५ (२०.८), वाशीम ३८.० (२०.०), यवतमाळ ३८.५ (२०.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com