नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडी

नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे.
Half of soybeans destroyed in Nagar district
Half of soybeans destroyed in Nagar district

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी, मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात सोयाबीनला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे काढणी करता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत भिजल्याने सोयाबीन शेंगांना कोंब फुटले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे पन्नास ते साठ हजार हेक्टरवर क्षेत्राला फटका बसला आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्ती म्हणजे १ लाख १७ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सरासरी ५४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र असताना यंदा सरासरीच्या २१७ टक्के पेरणी झाली. नगर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनचे पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या काळातच पावसाने सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांसह अन्य भागातही सतत जोरदार पाऊस झालेला असून एकापेक्षा अधिक वेळी अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 

अनेक भागातील सोयाबीन शेतात पाणी साठवून राहिले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे शेंगाला जागेवरच कोंब फुटले आहे. काही ठिकाणी सोयाबीन दाणे काळे पडले आहेत. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा पन्नास टक्केही उत्पादन हाती येण्याची शक्यता दिसत नाही. काही ठिकाणी तर पूर्णतः सोयाबीन वाया गेले आहे. जिल्हाभरात सुमारे पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 

शेतकरी अतुल तांबे म्हणाले, ‘‘यंदा सततच्या पावसामुळे शेतात पाणी साठल्याने सोयाबीन काढणी करता येईना. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सोयाबीनचा नफा नव्हे, झालेला खर्चही निघेल असे वाटत नाही.’’

कृषी विभाग बेफिकीर  नगर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा, काही प्रमाणात बाजरी, मका, भाजीपाला पिकांचे सततचा पाऊस, अतिवृष्टी, पुराने मोठे नुकसान झाले आहे. खरे तर असा काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असते. मात्र, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बहुतांश ठिकाणी गेलेच नाहीत. केवळ रात्री उशिरापर्यंत बैठका घेण्याचा फार्स करताना आतापर्यंत नेमके कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे, याबाबत साधी आकडेवारीही कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतीविषयक बाबीत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीच बेफिकीर असल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com