नाशिक तालुक्यात गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे नुकसान

नाशिक तालुक्यात गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे नुकसान
नाशिक तालुक्यात गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे नुकसान

नाशिक  : मागील आठवड्यात झालेल्या गारपिटीचा फटका नाशिक तालुक्यातील सिद्ध पिंपरी, आडगाव, लाखलगाव, ओढा, एकलहरे, माडसांगवी परिसरातील द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.  नाशिक तालुक्यातील ५०० हेक्टरहून अधिक द्राक्ष क्षेत्रावर गारपिटीमुळे बागांचे नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका बसल्याने आलेली पाने तुटली आहेत. तर मोठ्या प्रमाणावर पाने गळून खाली पडली आहेत. वेलींच्या काड्याही तुटल्या आहेत त्यास मार बसला आहे. गर्भधारणेच्या डोळ्यांवर गारांचा फटका बसल्याने काडीला इजा झाली आहे. त्यास काळे चट्टे पडले आहेत. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे नियोजन करून बागांच्या एप्रिल छाटणीनंतर पुढील नियोजन करून द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागा जगविल्या आहेत. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे पुढील हंगामातील नियोजन कोलमडले असून, मोठी अडचण निर्माण झाली आहे. सबकेनची कामे झाल्यानंतर फळांच्या गर्भधारणेसाठी व्यवस्थापन सुरू होते. प्रामुख्याने हा काळ काडीसाठी नाजूक असतो. त्यामुळे वेलीच्या काडीला फटका बसल्याने येणाऱ्या पुढील कामात माल धरण्यासाठी गोड्या बाराची छाटणी करताना परिस्थितीत बदल होईल. त्यामुळे अपेक्षित उत्पादकतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऐन हंगामाच्या नियोजनात संपूर्ण काड्या ठेचल्या गेल्या आहेत. त्यामुळे कड्यांना जखमा झाल्याने काड्यांचे डोळे निकामी झाले आहेत. या जखमांमुळे बुरशी जन्य रोग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त औषधांचा खर्च उत्पादकांच्या माथी पडणार आहे. काही ठिकाणी गारपिटीचे पंचनामे झाले आहेत तर काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत.  येणाऱ्या काळात नवीन बगलफुटी वाढविणे व नवीन येणाऱ्या पानांच्या संख्येत वाढ करणे यासाठी द्राक्ष उत्पादकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 

द्राक्ष बागायतदारांच्या या आहेत मुख्य समस्या

  •    पाने तुटून पडल्याने अन्ननिर्मितीकरिता अडचण 
  •    गर्भधारणेच्या टप्प्यावर कड्यांना इजा
  •    फळधारणेवर परिणाम होणार
  • गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर याचा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी हंगामात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून द्राक्ष बागायतदारांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे.  - रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक. 

    द्राक्षशेती मोठ्या अडचणीतून जात असताना मोठा खर्च करून बागांचे व्यवस्थापन केले. पाण्याची टंचाई असताना बागा जगविल्या. मात्र या गारपिटीने मोठे संकट उभे केले आहे. आता यातून सावरण्याला मोठा खर्च अपेक्षित आहे. - नीलेश ढिकले, शेतकरी, सिद्ध पिंपरी, ता.जि. नाशिक

    विद्राव्य खतांचा वापर करावा द्राक्ष बागेत सबकेनच्या आधीच्या अवस्थेत काड्यांना जख्मा झाल्या असतील अशा काड्या काढून त्या ठिकाणी योग्य कॅनोपी तयार करून घ्यावी. सबकेननंतरच्या काड्यांवर कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. घड निर्मितीमध्ये असणाऱ्या बागामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी घेऊन पुढील व्यवस्थापन करावे.  -प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक के. के. वाघ कृषी महाविद्यालय

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com