हातकणंगलेत अनुभवी विरुद्ध नवख्या उमेदवारात लढत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : प्रचारात राज्यातील शेती प्रश्‍नांबाबत हमखास चर्चा होण्याची शक्‍यता असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने हे भाजप शिवसेना युतीकडून निवडणूक लढविणार आहेत. देशपातळीवरील राजकारणात अनुभवाच्या पातळीवर नवख्या असणाऱ्या श्री. माने यांची श्री. शेट्टी यांच्याशी टक्कर होणार आहे.  

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शेती प्रश्‍नांवरून देशाच्या शेतकरी संघटनांमध्ये मजबूत स्थान मिळविलेल्या श्री. शेट्टी यांचा आत्मविश्‍वास सध्या तरी मजबूत आहे. श्री. माने प्रचाराच्या दरम्यान शेट्टी यांना नामोहरम करण्यासाठी कोणते प्रभावी मुद्दे वापरणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरेल. श्री. माने हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. माने कुटुंबीयाकडून शेट्टी यांना सातत्याने विरोध होत आला आहे. २००९ च्या निवडणुकीत श्रीमती निवेदिता माने यांचा पराभव श्री. शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर विरोधाची धार वाढली. परंतु श्रीमती माने यांनी पराभवानंतर मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही. यातच २०१४ मध्ये काॅँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी दिली.

श्री. आवाडे यांचाही शेट्टी यांनी पराभव करून मतदारसंघात वर्चस्व राखले. शेती प्रश्‍नांवर लढणारा खासदार अशी प्रतिमा त्यांची मतदारसंघात आहे. उस दरावर सातत्याने आंदोलने करून थेट शेतकऱ्यांमध्ये पोचण्याचे कसब त्यांनी मिळविले आहे. या उलट अगदी निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपर्यंत शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार ठरत नव्हते. काॅँग्रेस, राष्ट्रवादीकडेही मजबूत उमेदवार नव्हता.

राज्यपातळीवर श्री. शेट्टी यांनी दोन्ही पक्षांशी जुळवून घेतल्याने या आघाडीत ते सामील झाले. परिणामी, आघाडीची चिंता मिटली आहे. शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांच्या नावाची चर्चा होती.  परंतु, भाजप शिवसेना युती झाल्याने ही जागा शिवसेनेला गेली. आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली.

या मतदारसंघात जातीय समीकरणेही टोकदार आहेत. श्री. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना विविध पदांवर, संस्थांमध्ये संधी देताना बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोप श्री. माने यांच्याकडून प्रचारात होऊ शकतो. याचबरोबर श्री. शेट्टी हे कारखानदारांना अनुकूल निर्णय घेऊन बेरजेचे राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या आरोपाला ‘स्वाभिमानी’कडून कसे उत्तर दिले जाते यावरच हा सामना रंगणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com