Water Storage : हतनूर, गिरणा, वाघूरमधील जलसाठ्यांत कमालीची घट

हतनूर, गिरणा, वाघूरमधील साठ्यांत कमालीची घट
हतनूर, गिरणा, वाघूरमधील साठ्यांत कमालीची घट

जळगाव ः जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोचला असून, हतनूरमधील जिवंत पाणीसाठा संपला आहे. तर गिरणा व वाघूरमध्ये अनुक्रमे ११ व १४ टक्के जलसाठा राहिला आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा ग्रामस्थ, शेतकरी करीत आहेत.  गिरणा जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पात सुरवातीला किंवा पावसाळ्यात ४७ टक्के जलसाठा होता. तर वाघूरमध्येही ४६ टक्के जलसाठा झाला होता. कमी जलसाठ्यामुळे गिरणा व वाघूरमधून सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले नाहीत. गिरणा धरणातून नदीत पिण्यासाठी चार वेळेस आवर्तने कानळदा (ता. जळगाव) पर्यंत सोडण्यात आली. यातच या धरणातील साठा संपल्यात जमा झाला आहे. वाघूरमधूनही फक्त एकदाच शेतीसंबंधी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. नंतर आवर्तन सोडलेच नाही. अलीकडेच खरिपात कापूस लागवडीसाठी वाघूरमधून पाटचारीत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. परंतु, जलसाठा मुबलक नसल्याने या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. वाघूर धरणावर जळगाव, जामनेर शहरासह काही उद्योगांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. यामुळे शेतीसाठी या धरणातून पाणी सोडण्यासंबंधी प्रशासन निर्णय घेत नसल्याची माहिती मिळाली.  हतनूर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला होता. परंतु, त्यात गाळ अधिक आहे. या प्रकल्पातून दोनदा पिण्याच्या पाण्यासह इतर बाबींसाठी पाटचारीत पाणी सोडण्यात आले. नंतर शेतीसाठी पाणी सोडले नाही. आजघडीला या प्रकल्पाचा जिवंत जलसाठा संपला आहे. भुसावळ, सावदा येथे पाणीपुरवठ्यासंबंधीची भिस्त या प्रकल्पावर आहे. प्रकल्पात पाणीसाठा संपत आल्याने सावदा पालिकेची पिण्याच्या पाण्यासंबंधीची धावपळ वाढली आहे.  जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या बोरी, भोकरबारी, बहुळा, हिवरा, अंजनी, मन्याड हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. अग्नावतीमध्येही अत्यल्प जलसाठा आहे. तर सातपुडा पर्वतालगतचे रावेरातील सुकी, अभोरा, मंगरूळ या प्रकल्पांतील साठाही ३० टक्‍क्‍यांखाली आला आहे. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पातील साठाही संपण्याच्या मार्गावर आहे. तर चोपडामधील गूळ प्रकल्पातील साठाही २१ टक्‍क्‍यांपर्यंतच आहे. चोपडा व शिरपूर (जि. धुळे) नजीकच्या सातपुडा पर्वतातील अनेर धरणातील साठाही ३० टक्‍क्‍यांखाली आला आहे. अनेर नदीकाठच्या गावांमध्ये अलीकडेच पिण्याच्या पाण्यासंबंधी या धरणातून नदीत आवर्तन सोडण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील बुराई, मालनगाव प्रकल्पातील साठाही शून्यावर आहे. तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, नंदुरबारमधील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com