पूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण अशा अनेक मंगलप्रसंगी नारळ महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वयंपाकघरातही विविध पदार्थ बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने तहान भागते; तसेच पित्त कमी होते. ओले खोबरे आणि साखर सेवन केल्यास दाह कमी होतो. खोबरे ताकद वाढवणारे असते. थकवा जाणवत असल्यास खोबऱ्याचे साखरेसह सेवन करावे. उन्हाळ्यात खूप वेळा मूत्र विसर्जनावेळी आग होते. अशावेळी नारळाच्या पाण्याचे २ ते ३ वेळा सेवन करावे. वातप्रकृती, वार्धक्यात वाताच्या व पचनाच्या तक्रारींसाठी ओले खोबरे आणि लसूण यांची चटणी रोज खायला द्यावी. पण मिरची घालू नये. नारळाचे दूध ताकद वाढवणारे असते. नारळाचे दूध साखर घालून घेतल्यास रुची व शक्ती वाढण्यास मदत होते. पायांना मुंग्या येणे, पोटऱ्या व गुडघे दुखणे, पाय जड होणे यासाठी खोबरेल तेलाने मालिश करावी. मालिश केल्यावर शेकल्यास अधिक फायदा होतो. अंग कोरडे पडत असल्यास रोज खोबरेल तेल अंगाला लावून स्नान करावे; तसेच अंघोळीसाठी साबणाऐवजी उटणे वापरावे. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खोबरेल तेलात कापूर घालून केसांना लावा. नारळाची शेंडी जाळून राख करावी. ही पावडर मधासह घेतल्यास उचकी, उसलटी कमी होते. आहारात तिखट, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. अवेळी जेवण करणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पाणी प्यावे. पित्तामुळे होणारी जळजळ, मूत्र विसर्जनावेळी आग होणे; तसेच कमी प्रमाणात होणे, पोटदुखी अशा उष्णतेशी संबंधित तक्रारींसाठी योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७