अन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या तांदळापासून भाताचे विविध प्रकार, भाकरी, पापड्या अशा अनेक गोष्टी तयार केल्या जातात. दैनंदिन आहारात आपण तांदळाचा वापर करतो. तांदळाचे बासमती, इंद्रायणी, आंबेमोहोर असे विविध प्रकार आहेत. अशा या तांदळाचे अनेक औषधी गुणधर्म असतात. शास्त्रानुसार साळीचा जाड, लालसर तांदूळ गुणकारी मानला जातो. पण सगळ्याच प्रकारच्या तांदळामध्ये औषधी गुणधर्म असतातच.
भातापासून पेज तयार केली जाते. ही पेज औषधी आणि पौष्टीक अशी दुहेरी फायदेशीर आहे. तापामध्ये, प्रकृती ठीक नसल्यावर, पोट बिघडल्यानंतर भूक कमी होते. आजारपणामध्ये पचनशक्ती मंदावते. अशावेळी तांदूळ चांगले भाजून त्यामध्ये चार ते पाचपट पाणी घालून त्यात हिंग, जिरेपूड, मिरपूड घालावी. हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे. या पातळ पेजेमुळे ऊर्जा मिळते तसेच पचन सुधारते. तांदळाच्या लाह्या (साळीच्या लाह्या) उत्तम बलवर्धक असतात. या लाह्यांचा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला वापर केला जातो. या लाह्या पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास थकवा कमी होतो. लाह्यांना तूप, मीठ लावून खाल्यास तोंडाला चव येते. शिवाय पचन सुधारते व पित्त कमी होते. स्त्रियांना अशक्तपणामुळे अंगावरून पांढरे पाणी जाते. अशावेळी तांदळाचे धुवण २-३ वेळा घ्यावे. धुवण तयार करण्यासाठी तांदूळ २ चमचे घेऊन ४-५ वेळा धुवावेत. सहाव्या वेळेस धुतल्यावर जे पाणी वर राहते त्याचे सेवन करावे. यालाच तांदळाचे धुवण म्हणतात. बऱ्याचदा मासिक पाळीच्या वेळेस अतिस्राव होतो. त्यावेळीदेखील तांदळाचे धुवण उपयोगी पडते. उलट्यांचा त्रास होत असल्यावर काही खाऊ वाटत नाही. अशावेळी लाह्यांचे पाणी किंवा लाह्यांचे सेवन करावे. यामुळे ताकद मिळते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. तांदळाचे पीठ भाजून घ्यावे. तेल, जिरे फोडणीत हिंग, ताक, पाणी, मीठ घालून उकळावे. त्यात पीठ घालून उकड करावी. लिंबाचा रस घालून केलेली ही उकड रूची वाढवते. तोंडाला चव आणते. अजीर्णानंतर भूक वाढवण्यासाठी याचे जरूर सेवन करावे. पथ्य पित्त वाढवणारे, शिळे बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. काळजी
वारंवार उलट्या, पित्ताचा त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. मासिक स्राव अनियमित आणि भरपूर होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून घ्यावी. संपर्क : डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७