उन्हाच्या झळांनी काहीली वाढली 

राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.५, तर विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली 
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली 

पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे. मंगळवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.५, तर विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात आज (ता.२७) उष्ण लाटेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्ण लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  महाराष्ट्रासह पश्‍चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात राज्यात उष्ण लाट आली आहे. राजस्थानमधील चुरूसह, विदर्भातील अकोला, नागपूर मध्ये तापमान ४७ अंशाच्यापुढे असल्याने उष्णतेची तीव्र लाट आहे. तर राज्यातील जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे तापमान ४५ अंशापेक्षा अधिक आहे. सातारा आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असून, सरासरीपेक्षा ४.५ अंशाची वाढ झाल्याने उष्ण लाटेची स्थिती आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.४ अंश तापमान झाले आहे. यापुर्वी २२ मे १९४७ रोजी अकोल्यात सर्वकालीन उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. उत्तर भारतात पश्‍चिमी चक्रावाताची निर्मिती झाल्याने उद्यापासून (ता.२८) या भागात पावसाची शक्यता आहे. परिणामी दोन दिवसांत उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारपर्यंत (ता.२९) विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानातही घट होऊन उष्णतेची लाट काहीशी कमी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.१, धुळे ४४.०, जळगाव ४५.३, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्‍वर ३२.२, मालेगाव ४३.६, नाशिक ३९.२, निफाड ४०.०, सातारा ४०.४, सांगली ३९.७, सोलापूर ४५.०, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३३.७, औरंगाबाद ४३.१, परभणी ४६.०, नांदेड ४५.५, अकोला ४७.४, अमरावती ४६.०, बुलडाणा ४२.६, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४६.८, गोंदिया ४५.८, नागपूर ४७.०, वर्धा ४६.०.  अंदमानात मॉन्सूनची चाल शक्य  नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) रविवारी (ता.१७) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाले. मात्र त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली. आज (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तब्बल दहा दिवसापासून ‘जैसे थे’ असणारा मॉन्सून अंदमानात चाल करण्याची शक्यता आहे.  कमी दाब क्षेत्राचे संकेत  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ महा चक्रीवादळ निवळल्यानंतर आता केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. मंगळवारी (ता.२६) या भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. रविवारपर्यंत (ता.३१) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या कमी दाब क्षेत्राचा मॉन्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा केरळातील आगमन काहीसे लांबून, मॉन्सून पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com