सावधान ! आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाच्या झळांनी राज्य होरपळून निघाले आहे. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे सलग दुसऱ्या दिवशी यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशातील खारगोणे येथे देशातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर उद्या (ता. २९) लातूर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोचल्याने राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. विदर्भात सर्वाधिक तापमान असून अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा अक्षरश: भाजून निघाले आहे. तर पुणे, नगर, सातारा, परभणी येथेही उष्णतेची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४१ ते ४६ अंशांच्या दरम्यान असून अकोला, अमरावती, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, परभणी, धुळे येथे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे.  

मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, उद्या (ता. २९) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील लातूरसह परिसरातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

शनिवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४२.६ (४.७), नगर ४४.९ (५.४), धुळे ४५.१, जळगाव ४४.४ (१.७), कोल्हापूर ४१.० (४.०), महाबळेश्वर ३६.१ (४.४), मालेगाव ४३.२ (२.७), नाशिक ४१.७ (३.४), सांगली ४३.० (४.४), सातारा ४१.६ (४.९), सोलापूर ४४.३(३.५), अलिबाग ३१.८ (-०.५), डहाणू ३५.६ (२.२), सांताक्रूझ ३४.१ (०.९), रत्नागिरी ३३.२ (०.६), औरंगाबाद ४३.० (३.६), बीड ४४.२ (३.७), परभणी ४५.७ (४.२), उस्मानाबाद ४३.८ (४.६), अकोला ४६.४ (४.४), अमरावती ४५.४ (३.३), बुलडाणा ४३.१ (४.९), बह्मपुरी ४५.८ (४.१), चंद्रपूर ४५.६ (२.९), गोंदिया ४३.८ (२.३), नागपूर ४५.२ (३.२), वाशिम ४४.२, वर्धा ४५.७ (३.५), यवतमाळ ४४.५(३.०). 

चक्रीवादळ तीव्र होणार बंगालच्या उपसागरात ‘फोणी’ चक्रीवादळ घोंगावत असून, ही प्रणाली आज (ता. २८) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ जोरदार वारे, मुसळधार पावसासह मंगळवारी उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी किनाऱ्यालगत ताशी १३५ ते १६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने नागरिक व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

उष्ण लाट असलेली ठिकाणे  अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पुणे, नगर, सातारा, धुळे, परभणी. 

अशी ठरते उष्णतेची लाट  कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे असताना, तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल, तर उष्णतेची लाट आणि तापमानात ६.४ अंशांपेक्षा अधिक वाढ झाली असेल, तर उष्णतेची तीव्र लाट असते. कमाल तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असेल तरीही उष्णतेची लाट आल्याचे समजण्यात येते. याशिवाय किनारपट्टीच्या भागात कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले, तसेच तापमानात ४.५ अंशांची वाढ झाली तर तेथे उष्णतेची लाट मानली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com