उन्हाच्या चटक्याने महाराष्ट्र होरपळला 

उन्हाच्या चटक्याने महाराष्ट्र होरपळला 
उन्हाच्या चटक्याने महाराष्ट्र होरपळला 

पुणे  ः विदर्भात व मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही उन्हाचा चटका जाणवू लागला आहेत. संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या चटक्याने सध्या होरपळून निघत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चालू हंगामात कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस अशी उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मध्य प्रदेश ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश यासह महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट आली आहे. कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील खारगाव येथे देशातील उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुन्हा हवामान कोरडे झाले आहे. त्यातच कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मराठवाडा, विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम मध्य महाराष्ट्र, खानदेश, कोकणातील तापमानावर झाला आहे. यामुळे या भागातील  कमाल तापमान चाळीस अंशांवर गेले आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर कोकणात ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  

दक्षिण किनारपट्टीला मंगळवारी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात व हिंदी महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज (शनिवारी) चक्रिवादळात होण्याची शक्यता आहे. हे चक्रिवादळ श्रीलंकेतील त्रिंकोमालीपासून ११४० किलोमीटर, चेन्नईपासून १४९० किलोमीटर, मच्छलीपट्टणनमपासून १७६० किलोमीटर अंतरावर असेल. त्यानंतर हे चक्रिवादळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकणार असून ते मंगळवारी (ता.३०) या दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.  

उष्णतेची लाट दोन ते तीन दिवस राहणार राज्यात कोरडे हवामान असले तरी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याशिवाय अरबी समुद्राकडून येत असलेले बाष्प यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी येत्या रविवारी, सोमवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात अजून दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ४१.६ (३.६), नगर ४३.८ (३.८), जळगाव ४३.० (१.१), कोल्हापूर ४०.७ (३.४), महाबळेश्‍वर ३३.४ (१.३), मालेगाव ४२.६ (२.३), नाशिक ४०.५ (२.३), सांगली ४१.२ (२.४), सातारा ४०.४ (३.२), सोलापूर ४२.८ (२.४), सांताक्रुझ ३४.८ (१.८), अलिबाग ३१.८ (-०.१), रत्नागिरी ३३.६ (१.३), डहाणू ३४.५ (१.५), औरंगाबाद ४२.५ (३.४), परभणी ४५.० (३.९), उस्मानाबाद ४२.१ (३.०) अकोला ४६.३ (४.८), अमरावती ४५.० (३.५), बुलडाणा ४२.५ (४.६), ब्रह्मपुरी ४५.५ (४.५), चंद्रपूर ४५.४ (३.२), गोंदिया ३९.८ (-१.२), नागपूर ४४.३ (३.२), वर्धा ४५.५ (४.०), वाशीम ४३.८, यवतमाळ ४४.५ (३.६). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com