सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पावसाने झोडपले

जोरदार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला
जोरदार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला

सातारा  ः जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांसह कराड, सातारा, पाटण, वाई या तालुक्यांना सोमवारी रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अनेक नद्या वाहत्या झाल्या आहे. मात्र, पश्चिमेकडील कराड, सातारा, पाटण तालुक्यांतील अनेक पिकांत पाणी साचल्यामुळे पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

फलटण तालुक्यातील उपळवे गावानजीकचा वाझणी पाझर तलाव पावसामुळे फुटल्याने परिसरातील उसासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. फलटणबरोबर वाठार निंबाळकर व गिरवी मंडलात पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांत प्रथमच बाणगंगा नदी पुरामुळे भरून वाहू लागली आहे. खटाव तालुक्यातील येरळा नदीच्या खोऱ्यातील बुध, डिस्कळ परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नेर तलाव केवळ चार तासांत भरून वाहू लागला आहे. नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्यामुळे येरळा नदीला पूर आला. येरळा नदी व नेर तलावाच्या काठावर अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विहिरीही काठोकाठ भरल्या आहेत.

नेर तलावामुळे नेर, पुसेगाव, खातगुण, विसापूर, भांडेवाडी, जाखणगाव, खटाव, हुसेनपूर, सिद्धेश्वर कुरोली, नायकाचीवाडी, धकटवाडी, दरूज, सुंदरपूर, भुरकवडी, काटकरवाडी, वडूज व लोणी या भागांतील शेतीला पाणी मिळते. कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला आहे. भाडळे गावासह परिसरातील नदी- नाल्यांसह हिवरे पाझर तलाव तसेच लहान- मोठे पाझर तलाव व सिमेंट बंधारे पुन्हा भरून वाहू लागले आहेत. अचानक पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.

माण तालुक्याच्या पश्‍चिम भागास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे माणगंगेला पूर आला असून कोरड्या पडलेल्या आंधळी धरणात पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी रात्री साधारण पावणेदोनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली. काही वेळातच पावसाने पश्‍चिमोत्तर माण व्यापून टाकला. पावसाचा जोर एवढा होता की अर्धा ते पाऊण तासातच ओढ्यानाल्यांना पूर आला. अर्धा तासाची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा रात्री सव्वा तीनच्या सुमारास दमदार फटकेबाजीस सुरवात केली. पहाटे पाच वाजेपर्यंत पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. 

मलवडी परिसरातील भांडवली, शिंदी खुर्द, सत्रेवाडी, कुळकजाई, गाडेवाडी, कळसकरवाडी, परकंदी, परतवडी येथील ओढ्यानाल्यांसह सर्व बंधारे, माती नालाबांध, पाझर तलाव भरुन वाहू लागले. त्यामुळे प्रथमच माणगंगेला पूर येऊन ती दुथडी भरून वाहिली. नदी व ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले होते. 

सोयाबीन कुजण्याची भीती

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कराड, सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांत कमी अधिक स्वरूपात पाऊस झाला आहे. कराड, सातारा तालुक्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरणार आहे. जास्त पावसाने सोयाबीन पिवळे पडले असून कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवसभर ऊन, सकाळी धुके व रात्री पाऊस यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com