कोकण, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस

नदी पूर
नदी पूर

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला. कोकण, मध्य महाराष्ट्रासह दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील वऱ्हाड आणि पूर्व भागास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. घाटमाथ्यावरील डुंगरवाडी येथे सर्वाधिक ४५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर ताम्हीणी येथे ४३०, दावडी येथे ४२०, शिरगाव ३७० आणि भिरा येथे ३३० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनचा दणका सुरूच आहे, त्यात समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने मुरुगवाडा, पंधरामाड आणि मिऱ्या बंदरसह गावखडी खारवीवाडा येथे घरात पाणी घुसले. मंडणगडात भारजा नदीला पूर आल्याने दापोलीशी संपर्क तुटला असून पूल, रस्ता आणि किनाऱ्यावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर असून इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, सांगली जिल्ह्यांतील चांदोली व राधानगरी धरणांतून पाण्याचा अखंड विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेसह कृष्णा, वारणा व अन्य नद्यांचे पाणी आता नागरी वस्तीत शिरले. सांगलीतील चांदोली धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातील तीन पुलांसह ९ बंधारे पाण्याखाली गेले. वारणा नदीवरील अनेक पुलावर पाणी असल्याने आठ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. कोयना धरणातून पाणी सोडण्याने कृष्णा नदीतील पाणी पात्राबाहेर आले आहे, तर वारणा नदीतील पाणी शेतात गेले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून शनिवारी दुपारी एक वाजता सहा वक्रद्वारे प्रत्येकी २ फूट उघडून ११ हजार ४२७ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. तसेच, पायथा वीजगृहातून सुरू असलेला २१०० क्युसेक विसर्ग धरून कोयना धरणातून एकूण विसर्ग १३५२७ क्युसेक नदीपात्रात केला जात असल्याने कोयना नदीला पूर आला आहे.   नगर जिल्ह्यात भंडारदरा धरण भरले असून, मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुके, घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर कायम आहे. धरणे फुल्ल झाली असून, मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, निरा आणि कानंदी या नद्यांना पूर आले आहेत. भीमा नदीला पूर आल्याने उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. आवक कायम राहिल्यास चार-पाच दिवसांत धरणाची पाणी पातळी पन्नाशी गाठण्याची शक्‍यता आहे.  नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले, नद्या पूर आले. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला. किनवट तालुक्यातील बोधडी मंडळामध्ये सर्वाधिक १७३ मिमी पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला. घाटावरील लोणार, मेहकर या तालुक्यांमध्ये जोरदार वृष्टी झाली. अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होता.

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग)  कोकण : रोहा २९०, पोलादपूर २५०, पालघर २४०, माणगाव २३०, तळा, माथेरान प्रत्येकी २१०, म्हसळा २००, महाड, डहाणू, वाडा प्रत्येकी १९०, मंडणगड १८०, सुधागड, दापोली, जव्हार पत्येकी १७०, मुरूड, कल्याण १६०, खेड १५०, संगमेश्वर, अलिबाग, शहापूर प्रत्येकी १४०, श्रीवर्धन, सांताक्रूझ, भिवंडी, मुरबाड प्रत्येकी १३०, पेण, राजापूर, कर्जत, ठाणे प्रत्येकी १२०, मोखेडा, तलासरी, अंबरनाथ, विक्रमगड, वैभववाडी प्रतेकी ११०, खालापूर १००, चिपळूण ९०, हर्णे, पनवेल प्रत्येकी ८०.  मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २८०, लोणावळा २४०, इगतपुरी २२०, त्र्यंबकेश्वर, हर्सुल प्रत्येकी १६०, गणगबावडा, पौड, राधानगरी प्रत्येकी १५०, वेल्हे, ओझरखेडा प्रत्येकी १३०, चंदगड, आजरा, जावळी मेढा प्रत्येकी १२०, पेठ ११०, सुरगाणा १००, गारगोटी ९०, पन्हाळा ८०, नवापूर, शाहूवाडी, पाटण प्रत्येकी ७०, सातारा, वडगाव मावळ प्रत्येकी ५०, कागल, अक्रणी, भोर, कडेगाव प्रत्येकी ४०.  मराठवाडा : हिमायत नगर १००, कळमनुरी ९०, किनवट, हादगाव प्रत्येकी ७०, औंढा नागनाथ, नांदेड, पुर्णा, अर्धापूर प्रत्येकी ६०, हिंगोली, भोकर, उमरी, माहूर, पालम, कंधार, देगलूर, बिलोली प्रत्येकी ५०. धर्माबाद, मुदखेड, सेनगाव, देवणी, लोहा, वसमत, चाकूर, परभणी, सोयगाव, जळकोट, गंगाखेड प्रत्येकी ४०.   विदर्भ : पवनी २७०, सिंदेवाही १७०, भिवापूर १५०, चिमुर, भामरागड प्रत्येकी १४०, सडक अर्जुनी ११०, देसाईगंज, अरमोरी प्रत्येकी १००, मूल, नागभिड, ब्रह्मपुरी, सावळी, लाखंदूर प्रत्येकी ९०, उमरेड, गोरेगाच, सालकेसा, वरोरा, साकोली, बल्लारपूर प्रत्यकी ८०, एटापल्ली, उमरखेड, गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, हिंगणघाट, धानोरा, समुद्रपुर प्रत्येकी ७०, भद्रावती, कुरखेडा, लाखणी, मुलचेरा, लोणार, मेहकर प्रत्येकी ५०. कोर्ची, चंद्रपूर, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, रिसोड, पोम्बुर्णा, सेलू, पुसद, कोपर्णा प्रत्येकी ५०.  घाटमाथा : डुंगरवाडी ४५०, ताम्हिणी ४३०, दवडी ४२०, शिरगाव ३७०, भिरा ३३०, आंबोणे २६०, लोणावळा २४०, वळवण १६०, कोयना नवजा, खोपोली प्रत्येकी १५०, कोयना पोफळी, खंद प्रत्येकी १००. कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा बंगालच्या उपसागरात उद्या (ता. ५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर मॉन्सूनचा आस पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाने जोर धरला आहे. आज (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   धरणे ओव्हरफ्लो, नदी-नाले दुथडी

  • बुलडाणा : पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो.
  • पुणे : खडकवासला, मुळशी, वीरसह अनेक धरणांतून विसर्ग
  • रत्नागिरी : वाशिष्ठी आणि जगबुडी, भरजा नदीने धोक्याची पातळी गाठली, नारंगी नदीला पूर आला आहे
  • हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीला पूर
  • यवतमाळ : शेंबाळपिंपरी परिसरातून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी
  • औंढा नागनाथ : जिंतूर-औंढा रस्त्यावरील पूर्णा नदी भरून वाहू लागली. पिकांमध्येही पाणी
  • नाशिक : त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी तालुक्यांतील मुसळधारेमुळे गोदावरीला पूर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com