सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना कही खुशी तर कही गम ठरणार आहे. दमदार पावसामुळे सोयाबीन, घेवडा पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून, महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली आहे. मात्र उशिरा झालेल्या पेरणी व रब्बी हंगामांच्या दुष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
खरीप हंगामातील पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली असतानाही ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली. अनंत चतुर्दशीनंतर पवासाचा जोर वाढू लागला. त्यानंतर काही दिवसांचा अपवाद वगळता कमी अधिक स्वरूपात पावसाचा जोर कायम राहिला.
दुष्काळी तालुक्यांसह सर्वच भागांत या पावसाने हजेरी लावली. यामुळे पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिके भरण्यास फायदेशीर ठरला. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर खूपच वाढला होता.
विशेषकरून पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाटण, जावली, कऱ्हाड, सातारा, वाई तालुक्यांत पावसाचा जाेर अधिक होता. यामुळे या तालुक्यांतील सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी आदी पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उसाचे पीक पडले आहे. फलटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाला आलेली बाजारी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच दुष्काळी तालुक्यात करण्यात आलेल्या वाघा, काळा तसेच पांढरा घेवडा काढणीस आला असताना पावसाच्या हजेरीमुळे जाण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड पूर्ण ठप्प झाली आहे. यामुळे दिवाळी सणास स्ट्रॉबेरी उपलब्ध होण्याची शक्यता कमी होणार असल्याने चांगला मिळणाऱ्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. आले पिकात पाणी साचून आले कुजू नये यासाठी शेतातून पाणी काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
भात, ऊस, फळबागांना फायदेशीर
जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. हा पाऊस भातपिकास फायदेशीर ठरणार आहे. उसाचे दर समाधानकारक असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने उसाला पाणी द्यावे लागते. पावसाने हजेरी लावल्याने उसाचा पाणीप्रश्न सुटला आहे. मात्र वाऱ्यामुळे ऊस पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भरपावसात ऊस दाबण्याची कामे शेतकऱ्यांकडून केली जात आहेत. दुष्काळी तालुक्यातील फळबागा तसेच तरकारी पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरत आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरण्यांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.