नाशिक जिल्ह्याला पुन्हा पावसाचा दणका

नाशिक जिल्हा पाऊस
नाशिक जिल्हा पाऊस

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार ‘कमबॅक’ केले आहे. शनिवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे पिके काढणीला आले असताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बागलाण, दिंडोरी, देवळा, येवला, नाशिक, इगतपुरी तालुक्यांतील अनेक भागांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  दिंडोरी तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २) पावसाने झोडपून काढले. तालुक्याच्या पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तळेगाव, खतवड, गणेश गाव, ढकांबे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. कमी वेळात पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले. तर दिंडोरी गावाजवळ नाल्याचे पाणी नाशिक-कळवण महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांसह गुजरातला जाणाऱ्‍या प्रवाशांची कोंडी झाली.  बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात मोसम आणि करंजाड खोऱ्यातील पूर्व हंगामी द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन काढणीसाठी आलेला द्राक्ष माल मोठ्या प्रमाणवर खराब झाला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सटाणा शहरातील आठवडे बाजार शनिवारी असल्याने अचानक आलेल्या या पावसाने बाजारातील व्यापारी, शेतकरी, विक्रेते यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.  सटाणा बाजार समितीमध्ये व्यापारी वर्गाने खरेदी केलेल्या कांदा उघड्यावर असल्याने भिजला. येवला तालुक्यातही विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली. तर कळवण, देवळा, बागलाण तालुक्यांत मक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या तालुक्यांमध्ये विविध भागांत पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून शनिवार (ता. ५) पाणी सोडण्यात आले.  द्राक्षाच्या बागा अडचणीत  करंजाड व मोसम खोऱ्यातील पिंगळवडे, ताहाराबाद, सोमपूर, दसाने, पारनेर, बीजोटे, करंजाड, डोंगरेज, मुंगसे, टेंभे, लाडुद, जायखेडा, चौगाव आदी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोसम खोऱ्यातील पिगळवडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वेडू जीभाऊ भामरे यांच्या क्लोन जातीचा निर्यातक्षम द्राक्ष बाग जमीनदोस्त झाला. यामध्ये काढणीसाठी आलेला २० टन द्राक्ष माल खराब झाला आहे. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार दिलीप बोरसे या यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.  वीज पडल्याने नागरिकांचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथील सुनीता नंदराज भोये (वय २९) ही महिला शेतातून घरी येत असताना वीज अंगावर पडल्याने मृत झाली. तर घाणीच्या माथा येथील यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे (वय ६५ ) तसेच रासेगाव येथील शिवाजी भीमा इचाळे यांच्या बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत पावल्या. इगतपुरी तालुक्यातील बार शिंगवे येथील भरत भाऊराव भले (वय ४०) आणि तळेगाव बुद्रुक येथील हिराबाई कारभारी सदगीर (वय ५०) यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत पावल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com