पावसाचा जोर  पुण्यात ओसरला 

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात जोर ओसरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.
पावसाचा जोर  पुण्यात ओसरला 

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात जोर ओसरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पूर्व भागात पावसाने चांगलीच उघडीप दिली असून, काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.  गेल्या आठ ते दहा दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली. आतापर्यंत जवळपास १७ ते १८ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणेही लवकरच भरण्याची शक्यता आहे. जी धरणे भरली आहेत, अशा धरणांतून पाण्याचा विसर्स सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूर्व भागातील धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.  बुधवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२ मिलिमीटर, मुळशी १६, वरसगाव, पानशेत १३ मिलिमीटर पाऊस पडला. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, कळमोडी, चासकमान, वडीवळे, पवना, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा शिडकावा झाला, तर येडगाव, वडज, घोड, विसापूर, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, उजनी, चिल्हेवाडी या धरणक्षेत्रांत पावसाने उसंत दिल्याची स्थिती होती. आतापर्यत झालेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून, पिके चांगलीच तरारली आहेत. पूर्व भागात सोयाबीन, बाजरी पिकांची काढणी सुरू असून, काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत.

खडकवासल्याच्या आवर्तनाने  इंदापुरातील शेतकऱ्यांना दिलासा 

इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी खडकवासला कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या पावसाअभावी विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना उसासारख्या पिकांना पाणी देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गरजेच्या वेळी आवर्तन आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाळ्याचे चार महिने संपत आले तरी अद्याप इंदापूर तालुक्यात या कालव्याच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे सिंचनाची सर्व भिस्त खडकवासला कालव्याच्या पाण्यावर सध्या अवलंबून आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याला आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. खडकवासला धरणाच्या पाणलोटात झालेल्या चांगल्या पावसामुळे प्रकल्पात सध्या शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग मागील शनिवारपासून सुरू केला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com