कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा 

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पोषक हवामान झाल्याने दक्षिण भारतासह राज्यातही पावसाला सुरवात झाली आहे. आज (ता. १९) कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.      देशभरातून मॉन्सून परतला आहे. यातच वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे. दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने तापमानात चढ-उतार सुरू आहे. पहाटेच्या वेळी पडणारे धुके, हवेत आलेल्या गारठ्यानंतर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन सोमवारपर्यंत (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी (ता. १८) सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील राहुरी तालक्यातील ब्राह्मणी येथे जोरदार सरी पडलाल्या. तर पुणे जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला. तर गुरुवारी (ता. १७) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे भातकापणीत अडथळा निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री काही भागांत तुरळक पाऊसदेखील झाला. शुक्रवारी (ता. १८) पहाटेपासून ढगाळच वातावरण आहे. काही भागांत रिमझिम पाऊसदेखील झाला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी केलेला भात भिजला. काही शेतकऱ्यांनी लगबगीने भाताची बांधणी करून ठेवली आहे. सांगली पाऊस, धुके, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला. शेतात पाणी साचून राहिले होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले आहेत. धुकेही पडले होते. गुरुवारी सांगली जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोल्हापूरमध्येही दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी धुके, तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान होते. हवामान बदलाचा फटका प्रामुख्याने भाजीपाला पिकाला बसत आहे.   शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (-०.८), जळगाव ३३.४(-१.६), कोल्हापूर ३१.०(०.७), महाबळेश्वर २६.१(०.४), मालेगाव ३२.५ (-१.१), नाशिक ३०.४ (-२.१), सातारा ३०.० (-०.८), सोलापूर ३३.२ (-०.१), अलिबाग ३४.२ (१.८), डहाणू ३५.६ (२.८), सांताक्रूझ ३६.० (२.६), रत्नागिरी ३५.०(२.८), औरंगाबाद ३०.७ (-१.४), परभणी ३३.२ (०.१), नांदेड ३३.० (-०.६), अकोला ३३.६ (-०.३), अमरावती ३३.४ (-०.६), बुलडाणा ३०.० (-१.०), चंद्रपूर ३२.८(-०.५), गोंदिया ३२.५(-०.७), नागपूर ३२.६ (-०.७), वर्धा ३२.५ (-०.८), यवतमाळ ३२.०(०.३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com