कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. तर घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम सरी येत आहेत. आज (ता. २७) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला मॉन्सूनचा आस यामुळे पावसाला पोषक हवामान झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेशात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरातमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी दुपारनंतर संपूर्ण कोकणसह, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढला होता. तर गडचिरोलीसह पूर्व विदर्भात ढग जमा होऊ लागले होते. दक्षिण मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत ढगांची दाटी झाली होती. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला हलक्या सरींनी दिलासा दिला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांत आकाशात ढगांची गर्दी असली तरी पावसाने जोर धरलेला नाही. मात्र रिमझिम पावसाने पिकांना जीवनदान मिळले. विदर्भातही पावसाने गुरुवारी रात्री अनेक भागांत हजेरी लावली. शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील विक्रमगड येथे १५० मिलिमीटर, वाडा १४०, मंडणगड व माथेरान येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर विदर्भातील रामटेक येथे ११० मिलिमीटर, नागपूर १०८, पारशिवणी ९० आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी व पेठ येथे ११० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचे पुनरामन झाले असून, काही भागांमध्ये संततधार सुरू आहे. इगतपुरी, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक शहरांसह तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. जरी या पावसाचे आगमन होत असले तरी धरण क्षेत्रात अपेक्षित पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस लांबला तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. पुणे जिल्ह्यात गुरूवारी (ता. २५) दुपारनंतर जिल्ह्यात हलक्या पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाच्या सरींची रिपरीप सुरूच होती. गेले काही दिवस उघडीप असलेल्या धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्यासह खंडाळा व कोरेगाव तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गुरुवारी (ता. २५) झाला. महाबळेश्‍वर, जावळी, पाटण या तालुक्यांत चांगला पाऊस सुरू असल्याने भाताच्या लागवडीस वेग आला आहे. सातारा, कराड, वाई, कोरेगाव, खंडाळा तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच माण, खटाव व फलटण या तालुक्यांत मात्र अजून पावसाची गैरहजेरीच आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार राहिली. गगनबावडा, चंदगड, राधानगरी तालुक्‍यांत दिवसभर पाऊस सुरू होता. पावसास पुन्हा सुरुवात झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : विक्रमगड १५०, वाडा १४०, मंडणगड, माथेरान प्रत्येकी १२०, बेलापूर, खेड, मोखाडा, पोलादपूर, रोहा प्रत्येकी ९०, भिरा, जव्हार, म्हसळा, श्रीवर्धन प्रत्येकी ८०, भिवंडी, दोडामार्ग, कर्जत, मुरबाड, पनवेल, पेण, शहापूर, उल्हासनगर प्रत्येकी ७०, अंबरनाथ, कल्याण, खालापूर, सुधागड प्रत्येकी ६०, चिपळूण, देवगड, लांजा, मुरूड, ठाणे, उरण प्रत्येकी ५०. माणगाव, मुलदे, सांताक्रूझ, पेडणे, संगमेश्‍वर, सांगे, सावंतवाडी, वेंगुर्ला प्रत्येकी ४०. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी, पेठ प्रत्येकी ११०, सुरगाणा ८०, गगनबावडा, खेड, लोणावळा, महाबळेश्‍वर, नवापूर, ओझरखेडा प्रत्येकी ७०, त्र्यंबकेश्‍वर ६०, हर्सुल, साक्री, शाहूवाडी प्रत्येकी ५०. घोडेगाव, चंदगड, दिंडोरी, पौड प्रत्येकी ४०, राधानगरी, शहादा, तळोदा, वडगाव मावळ प्रत्येकी ३०, अकोले, जावळीमेढा, जुन्नर, कोपरगाव, नंदूरबार, पाचोरा, पन्हाळा, पाटण, वेल्हे, वाई प्रत्येकी २०. मराठवाडा : औंढा नागनाथ, हिमायतनगर प्रत्येकी ४०, हदगाव, जाफ्राबाद, जिंतूर, कळमनुरी, किनवट, सोयगाव, उमरी प्रत्येकी २०, अर्धापूर, धर्माबाद, हिंगोली, लोहा, माहूर, मुखेड, नायगाव खैरगाव, परतूर, सेनगाव प्रत्येकी १०. विदर्भ : रामटेक ११०, नागपूर १०८, पारशिवणी ९०, कोर्ची, मोहाडी प्रत्येकी ७०, अहेरी, अर्जुनी मोरगाव, चिमूर, देवरी, गडचिरोली, हिंगणा, कामठी, समुद्रपूर, उमरेड प्रत्येकी ६०, आमगाव, भंडारा, चिखलदरा, देसाईगंज वडसा, गोंदिया, गोरगाव, कुही, लाखनी, मौदा, नागभीड, सडकअर्जुनी प्रत्येकी ५०, आरमोरी, भिवापूर, ब्रह्मपुरी, पवनी, तुमसर प्रत्येकी ३०, अर्णी, भद्रावती, चंद्रपूर, देवळी, धानोरा, कुरखेडा, साकोली, सिंदेवाही, सिरोंचा, तिरोडा प्रत्येकी ३०. घाटमाथा : आंबोणे १२०, ताम्हिणी, खंद, डुंगरवाडी, दावडी प्रत्येकी ९०, शिरगाव, भिवापुरी, कोयना पोफळी प्रत्येकी ८०, वाणगाव, कोयना नवजा प्रत्येकी ६०, खोपोली ५०, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवण प्रत्येकी ४०. कमी दाब क्षेत्राची निर्मिती बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत शुक्रवारी (ता. २६) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फालोदीपासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे देशभर पाऊस सक्रिय झाला आहे. बुधवारी (ता. ३१) बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com