तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता.१४) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये रूपांतर झाल्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा होण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी ५५-६५ किलोमीटर ते जास्तीत जास्त ७५ किलोमीटरपर्यंत होता. काकिनाडापासून आग्नेयेकडे १५ किलोमीटर, तेलंगणातील खम्मनपासून आग्नेयेकडे २०० किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेश व तेलंगाणा या भागातून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले होते. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. येथे पडणार जोरदार पाऊस  बुधवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ.   गुरूवार ः ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे. शुक्रवार ः मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे. शनिवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक.

राज्यातून मॉन्सूनची माघार २० ऑक्टोबरला? सध्या परतीच्या पावसाला राज्यातून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या दोन ते चार दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर साधारणपणे २० ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मॉन्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील. तर अधूनमधून उन्हासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com